संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेले कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून, वरवर पाहता हा सामना बरोबरीत सुटला असल्याचे दिसते. चिंचवडमध्ये अपेक्षेप्रमाणे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांचा विजय झाला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
अश्विनी यांचा विजय हा सहानुभूतीच्या लाटेमुळे झाला असून, भाजपचे मताधिक्य तेथे लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली नसती, तर भाजपला मतविभागणीचा फायदा मिळाला नसता. शिवाय कलाटे यांच्या मागे वंचित आघाडीचीही ताकद लागलेली होती. कलाटे यांना महाशक्तीचे पाठबळ तर होतेच; परंतु आपण भाजपच्या विरोधात आहोत, असा आभास उत्पन्न करणारे प्रकाश आंबेडकर प्रत्यक्षात कोणते खेळ खेळण्यात माहीर आहेत, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पिंपरी-चिंचवड ही आशियातील एक मोठी महानगरपालिका असून, उद्योगक्षेत्रात राज्याचे नाव देशपातळीवर नेण्यात तिची कामगिरी मोठी आहे. शिवाय हा मतदारसंघ विशाल असून, ग्रामीण भागाचे शहरात झपाट्याने कसे स्थित्यंतर होते, ते येथे दिसून येते. अनेक वर्षे पिंपरी-चिंचवडवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती आणि या भागास आधुनिक चेहरामोहरा देण्याचे श्रेय त्यांनाच जाते. मात्र, गेली काही वर्षे तेथे भाजपची सत्ता आहे. परंतु महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपचा पिंपरी-चिंचवडमधील कारभार चांगला नाही.
लाचखोरीच्या आरोपावरून भाजपच्या स्थायी समितीच्या अध्यक्षालाच अटक झाली होती आणि ते आता जामिनावर सुटले आहेत. केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेत सत्ता आणि सहानुभूतीची लाट असूनदेखील चिंचवडमधील भाजपचा विजय चमकदार म्हणता येणार नाही. राहुल कलाटे यांनी जर बंडखोरी केली नसती, तर अश्विनी यांचा विजय होणे कठीण झाले असते, असे आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसते. एक लाख मताधिक्याने आपला विजय होईल, असा दावा भाजपने केला होता. परंतु तसे काहीही घडले नाही. चिंचवडमध्ये मतदारांना आमिषे दाखवण्यात आली, असे बोलले जाते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर ठेकेदारी चालते असे आरोप असून, वाळू, दगडविटा, सिमेंटपासून ते सुरक्षासेवेपर्यंत सर्वत्र सत्ताधाऱ्यांची ठेकेदारी चालते, अशी चर्चा आहे. तेथील जमिनींच्या व्यवहारांत राजकारण्यांचे मोठेच हितसंबंध आहेत. आता अश्विनी जगताप विजयी झाल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात तरी भ्रष्टाचार नियंत्रणात राहील असे पाहावे. तसेच मतदारसंघातील नवीन वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी, महिलासुरक्षा आणि उद्योजकांकडून मागितली जाणारी खंडणी या समस्यांवर लक्ष्य केंद्रित करावे. कसबा विधानसभा मतदारसंघात सतत सामान्यांमध्ये राहून त्यांच्यासाठी तळमळीने काम करणारा नेता कोणती करामत करून दाखवू शकतो, हे रवींद्र धंगेकर यांनी सिद्ध केले आहे.
कसबा हा कधीही भाजपचा बालेकिल्ला नव्हता, तर भाजपला मतविभागणीचा फायदा मिळत होता, असे धंगेकर सतत ठासून सांगत आहेत. अमुक मतदारसंघ हा तमुक पक्षाचा बालेकिल्ला असे म्हटले, की विरोधी पक्ष अगोदरच हातपाय गळून बसतो, हे भाजपला पुरते ठाऊक होते. दुसरीकडे जनतेचे प्रश्न सोडवले, जनतेशी सतत संपर्कात राहिले, तरच बलाढ्य सत्ताधाऱ्यांना यशस्वीपणे तोंड देता येईल, हे धंगेकरांनी दाखवून दिले आहे. एरवी सकाळपासून रात्रीपर्यंत चॅनेलवाल्यांसमोर तोंड वाजवत बसले की आपले काम संपले, असे मानणाऱ्यांपैकी ते नाहीत. शिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मिळून एकोप्याने ही निवडणूक लढवली. यापूर्वी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांत महाविकास आघाडीने एकीचे बळ दाखवून दिले होते. एरवी अत्यंत चलाखपणे खेळ्या करणारा भाजप कसब्यामध्ये मात्र सुरुवातीपासून फसत गेला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन भाजपने केले होते. तो प्रस्ताव अजित पवारांनी तत्परतेने फेटाळून लावला. त्यानंतर दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट न दिल्यामुळे ब्राह्मण समाजात नाराजी पसरली. विरोधकांनी या गोष्टीचा भरपूर फायदा उचलून शनिवार, सदाशिव, नारायण या पेठा वगैरे परिसरात ब्राह्मण समाजात तीव्र असंतोष निर्माण होईल, असा पद्धतशीर प्रचार केला.
खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसून, ते लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास उपस्थित राहिले नव्हते, परंतु तरीही प्रचारासाठी त्यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावलेल्या अवस्थेत घराबाहेर प्रचारात उतरवण्यात आले. यावरूनही भरपूर टीका झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अन्य काही कामांच्या निमित्ताने पुण्याचा दौरा करून बाबासाहेब पुरंदरे निर्मित शिवसृष्टीला भेट दिली. तसेच ओंकारेश्वरला जाऊन आरतीही केली आणि पक्षाच्या मतदारांना योग्य तो संदेश दिला. निवडणूक आचारसंहिता लागू असताना शहा यांनी वाकड येथे सहकार परिषदेस उपस्थिती लावली याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय भाजपचे अनेक मंत्री पुण्यात तळ ठोकून होते आणि मतदारांना लक्ष्मीदर्शनही घडवण्यात आले, असे आरोप झाले. ही निवडणूक भाजपच्या हातातून गेली आहे असे चित्र निर्माण झाले आणि अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही पाय रोवून दोन-तीन दिवस प्रचार केल्यामुळे भाजपची धावपळ उडाल्याचे दिसून आले. तर भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी “कोण धंगेकर?’ अशी भाषा केल्यामुळे, कसबा मतदारसंघातील पूर्व भागातील मतदार उसळून उठले. एवढेच काय, तर संघ-भाजपचे प्रभाव क्षेत्र मानल्या जाणाऱ्या पेठांमधूनही धंगेकरांना भरपूर मते मिळाली. कसब्याच्या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचाही प्रयत्न झाला, पण त्याला यश मिळाले नाही.
कसब्यात महाविकासला मिळालेले यश आणि चिंचवडमध्ये भाजपचे अल्प मताधिक्य यामुळे राज्यातील राजकीय चित्र हळूहळू बदलत आहे, असे दिसते. या दोन पोटनिवडणुकांवरून संपूर्ण राजकारणाचा भविष्यकालीन ताळेबंद मांडणे चुकीचे ठरेल; परंतु आमच्या समोर तयारीचा पैलवान आहेच कोण, असा पवित्रा असलेल्या फडणवीस यांना हा थेट धक्का असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आत्मपरीक्षण केले पाहिजे.