* आढळरावांनी १ हजार १०६ प्रश्न, कोल्हेंनी ६२४ प्रश्न विचारले
पुणे – संसदीय कामकाजात विचारलेले तारांकित- अतारांकित प्रश्न, मांडलेली खासगी विधेयके आणि चर्चेत घेतलेला सहभाग यांचा १६ वी आणि १७ व्या लगतच्या लोकसभेतील शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कामकाजाचा हिशोब sansad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दोघांच्या कामकाजाची तुलना करता आढळराव हे कामकाजात कोल्हेंपेक्षा अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.
तत्कालीन खासदार आढळऱाव यांनी १६ व्या लोकसभेत १ हजार १०६ प्रश्न विचारले. तर त्यानंतरच्या १७ व्या लोकसभेत खासदार कोल्हे यांनी जवळपास त्यांच्यापेक्षा निम्मे म्हणजे ६२४ प्रश्न विचारले आहेत. आढळराव यांची त्यांच्या कालावधीत संसदेतील हजेरी ६९ टक्के होती, तर कोल्हे यांची त्यांच्या कालावधीतली हजेरी ६१ टक्के आहे.
दोघांच्या कामकाजाचा तुलनात्मक वेध घेतला असता आढळऱाव यांनी १ हजार ४२ तारांकित प्रश्न तर ६४ अतारांकित प्रश्न मांडले. तर कोल्हे यांनी ६०८ तारांकित तर १६ अतारांकित प्रश्न मांडले. आढळराव यांनी त्यांच्या कालावधीत १६ खासगी विधेयके मांडली.
तर कोल्हे यांनी एकही खासगी विधेयक मांडले नसल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. आढळऱाव यांनी ३६ वेळा संसदीय चर्चेत सहभाग घेतला आहे. कोल्हे यांनी २६ वेळा संसदीय चर्चेत सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे.