लडाखमधलं पुगा खोरं. समुद्रसपाटीपासून साडेचार हजार मीटर उंचीवर आणि लेहपासून सुमारे दीडशे किलोमीटर दूर. इथले गरम पाण्याचे फवारे प्रसिद्ध आहेत. आणि इथेच आपलं पहिलं भूऔष्णिक ऊर्जा केंद्र उभं राहातं आहे. त्याची क्षमता असेल एक मेगावॅट. दोनशे घरांना पुरेल इतकी वीजनिर्मिती इथे होणार आहे. शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या आपल्या प्रयत्नांमध्ये हा एक मानाचा तुरा होणार आहे. आणि भूऔष्णिक ऊर्जानिर्मितीत भारताचं नाव पहिल्यांदाच येणार आहे.
तशी भूऔष्णिक म्हणजे जिओथर्मल एनर्जी खूप काळापासून चर्चेत आहे. भूपृष्ठाखाली खोलवर तापमान जास्त असतं. तिथून निघालेले गरम पाण्याचे झरे किंवा फवारे, हे दृश्य काही नवीन नाही. भूगर्भातल्या उष्णतेमुळे तिथलं पाणी तापतं. ते बाहेर येतं तेव्हा आपण त्याचा वापर ऊर्जा निर्माण करण्यासाठी करून घेऊ शकतो. भूगर्भातली उष्णता दीर्घकाळ टिकून रहाणारी आहे तर पावसाच्या चक्रामुळे जमिनीत पाणी सतत मुरत असतं. त्यामुळे हा स्रोत शाश्वत आहे.
पण ही ऊर्जा सहजपणे इतर कामांकडे वळवणं तितकंसं सोपं नाही. सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा तुलनेत निर्माण करायला आणि वापरायला सोपी असते. अलीकडे सौर घटांची कार्यक्षमता वाढते आहे. पवनचक्क्यांच्या पात्यांच्या पारंपरिक रचनेत बदल होतो आहे. त्यानेही पवन ऊर्जेचं उत्पादन वाढवता येतं. त्यामुळे जमिनीखालील उष्णतेचा वापर करून वीजनिर्मितीकडे लक्ष कमी असतं. अमेरिका, इंडोनेशिया, आइसलॅंड असे काही देश ही ऊर्जा वापरत आहेत. वर्षाला एक गिगावॅट किंवा त्याहून जास्त ऊर्जानिर्मिती ते करतात.
देशाच्या एकूण गरजेच्या तुलनेत हा वाटा कमी असला तरी आशादायक आहे. भारतात गरम पाण्याचे झरे किंवा कुंड पुष्कळ ठिकाणी आहे. त्यामुळे या स्रोताचा विचार साधारणपणे 1970 पासून सुरू आहे. आता अपारंपरिक स्रोतांची निकड भासायला लागल्याने याविषयीच्या प्रयोगांना प्राधान्य मिळत आहे. जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने एकूण साडेतीनशे अशी ठिकाणं शोधून ठेवली आहेत. त्यांच्यापैकी काहींचं आजवर पर्यटनासाठी आकर्षण होतं.
पुढे तिथे छोटी ऊर्जानिर्मिती केंद्र असतील. लडाखमधल्या पुगा खोऱ्यात अशी बरीच केंद्र उभारता येतील. आपल्या पहिल्या केंद्रासाठी तिथे एक किलोमीटर खोल खोदकाम केलं आहे. तिथून बाहेर येणाऱ्या. वाफेचा वापर करून वीजनिर्मिती होईल. उरलेली वाफ पुन्हा जमिनीत जिरेल. या प्रकल्पात ओएनजीसीसोबत आइसलॅंडच्या जिओसर्व्हे संस्थेची मदत होते आहे.
ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल याचे परिणाम दिसत असताना आपल्याला पर्यावरणस्नेही ऊर्जास्रोतांकडे वळण्याची गरज आहे. त्यात आपण सौर आणि पवन ऊर्जेच्या समवेत भूऔष्णिक स्रोतांचा नक्कीच विचार करू शकतो. भूऔष्णिक ऊर्जा उत्पादनाची आपली क्षमता जवळजवळ दहा गिगावॅट इतकी आहे. अर्थात, तितक्या क्षमतेने विद्युत ऊर्जा निर्माण करून सर्वांना तिचा नियमित पुरवठा करण्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.