दक्षिण भारतातील पुद्दुचेरी शहर आपल्या निसर्गसौंदर्यामुळे ओळखला जातो. मात्र, या भागात लहान बालकांच्या आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या अनेक गंभीर समस्या आहेत. पुद्दुचेरीत राहणाऱ्या एलिस थॉमस अनेक वर्षांपासून या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत.
अशा मुलांसाठी त्या सेवाभावी संस्था चालवत आहेत. 53 वर्षीय एलिस सांगतात की, माझ्या कहाणीपेक्षा अधिक प्रेरणा या मुलांच्या कहाणीत आहे. माझ्या छत्रछायेत मोठी झालेली मुले कोणत्याही सोयीसुविधेशिवाय जीवनात चांगल्या पदापर्यंत पोहोचली आहेत, हीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एक 10 वर्षांचा मुलगा रस्त्यावर रडत फिरत होता. त्याला पाहून एलिस यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या मुलाच्या जीवनात असलेल्या दुःखाबाबत समजले. त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला मद्य आणि जेवणासाठी पैसे मागून आणले नाही म्हणून मारझोड केली होती. एलिस यांच्या लक्षात आले की, अनेक मुलांच्या आयुष्याचा हा रोजचाच भाग आहे.
या घटनेमुळे तेव्हा 21 वर्षांच्या एलिस यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. त्यांनी अशा मुलांसाठी काम करायला सुरुवात केली आणि सर्वप्रथम त्यांच्यासाठी आश्रयस्थान बनविले. या मुलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे आज हजारो मुलांची आई बनून त्या त्यांचे पालनपोषण करीत आहेत. यामध्ये अनेक अनिवासी भारतीयांचीही मुले आहेत; तर काही लैंगिक आत्याचाराने पीडित असलेली मुलेही आहेत.
इतक्या वर्षांच्या कष्टामुळे एलिस यांच्याकडील सर्व मुले आज स्वतःच्या पायावर उभी आहेत. कुणी रिक्षा चालवतो, तर कुणी शिक्षक आहे; तर अनेक मुले आयटी कंपनीत काम करीत आहेत. एलिस या 32 वर्षांपासून अनेक गरजवंत मुलांची आई बनून त्यांचे पालनपोषण करीत आहेत. शेकडो मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर करून एलिस यांनी त्यांना नवा प्रकाशकिरण दाखविला. त्यामुळे या सर्व मुलांनी एलिस यांना गॉडमदरच्या जागी बसविले आहे.