घटनेत आणखी काही दुरुस्त्या कराव्यात
नवी दिल्ली, दि. 2 – घटनेच्या इतर काही कलमात दुरुस्त्या करण्यासाठी आणखी एक सर्वसमावेशक विधेयक मांडण्यात यावे, अशी मागणी आज लोकसभेत डी. एन. तिवारी यांनी केली. चव्वेचाळीसाव्या घटना दुरुस्ती विधेयकाच्या तिसऱ्या व अंतिम वाचनाच्या वेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना तिवारी यांनी ही मागणी केली.
ते म्हणाले की, सध्याच्या लोकसभेची मुदत आणखी एक वर्षाने वाढविण्याचे योजिलेलेच असल्यामुळे सरकारला आणखी दुरुस्त्या मांडण्यास पुरेसा वेळ आहे. या दुरुस्तीमुळे संसदेच्या सर्वोच्चपणाची खातरजमा होत असल्यामुळे व संसदीय लोकशाही टिकून राहणे हा या विधेयकाचा उद्देश आहे.
विचारसरणी शास्त्रीय असली पाहिजे
नवी दिल्ली – अंधश्रद्धेने आपले जीवन झाकाळून टाकले आहे. अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आपली विचारसरणी शास्त्रीय असली पाहिजे, असे उद्गार पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी येथे काढले. आर्यभट्ट या सुप्रसिद्ध गणितज्ज्ञाच्या 1500व्या जयंतीनिमित्त “इंडियन नॅशनल सायन्स अकादमी’ने आयोजित परिषदेत त्या बोलत होत्या.
विनापरवाना राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध मोहीम
पुणे – विनापरवाना पुण्यात वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी मोहीम चालविली आहे. केंद्र शासनाने परदेशीय पाहुण्यांबाबत परवाना मुदतीवर कडक निर्बंध घातले आहेत.