शिक्षण पद्धतीत बदल हवा
भुवनेश्वर, दि. 8 – देशातील शिक्षण व्यवस्थेत अशा तर्हेने बदल करण्याची गरज आहे की, तरुण माणसे निर्भयपणे सत्य व असत्य, चूक-बरोबर यात फरक करू शकतील, तसेच आपल्या पूर्ण विचाराने वागू शकतील, असे प्रतिपादन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केले.
शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी आपण शिक्षणतज्ज्ञ व केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करीत असल्याचेही देसाई म्हणाले. सध्याची शिक्षणपद्धती ही ब्रिटिशांकडून आपल्याला मिळाली आहे. ती त्यांच्या फायद्याची होती. 20 वर्षे या पद्धतीस झाली आहेत. जादूने त्यामध्ये लगेच फरक होणार नाही, असेही मोरारजी देसाई म्हणाले.
अपंगांना नुसती सहानुभूती दाखवू नका
अलिबाग – समाजाने अपंगांकडे नुसते सहानुभूतीने न बघता, त्यांना स्वाभिमानाने जगता यावे म्हणून मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सादिक अली यांनी केले.
गव्हाचे पीक विक्रम मोडणार
नवी दिल्ली – यंदा रब्बी हंगामातील पिके चांगली येतील; गव्हाचे पीक तर 1976-77च्या विक्रमी (2.3 कोटी टन) पिकापेक्षाही अधिक येईल, असा अंदाज आहे. दक्षिणेकडील राज्यांत तांदळाचे पीक गेल्या वेळेपेक्षा अधिक येईल. मोहरीचे पीकही अधिक येईल, असा अंदाज आहे. कापसाचे उत्पादन गेल्या वर्षी 71 लक्ष गाठी इतके झाले होते. यंदा ते 8 ते 9 लाख गाठी अधिक येईल.