पॅरोल, फर्लो वगैरे शब्द, त्यांचे खरेखुरे अर्थ, त्याबाबतचे नियम आणि काही “अतिविशिष्ट’ लोकांच्या बाबतीत नियमांना लावल्या जाणाऱ्या वाटाण्याच्या अक्षता या विषयावर जवळजवळ दहा वर्षांनी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुळात हे शब्द तुरुंगवासाशी संबंधित आहेत आणि तुरुंगात जन्मलेल्या श्रीकृष्णापासून तुरुंगवास भोगून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या योद्ध्यांपर्यंत साऱ्यांना आदर्श मानणारा सामान्य माणूस स्वतः मात्र पापभिरू असल्यामुळे सहसा त्या वाटेला गेलेला नसतो. त्यामुळे अशा विषयांची वारंवार उजळणी करून लक्षात ठेवणंही शक्य नसतं.
अभिनेता संजय दत्त याला कारागृहात असताना सातत्यानं पॅरोल आणि फर्लो या दोन्ही प्रकारच्या रजा मिळत होत्या आणि तो सेलिब्रिटी असल्यामुळे त्या बातम्या मोठ्या होत होत्या. अर्थातच हे दोन्ही प्रकारच्या रजा आणि त्यांच्या नियमावलीविषयी चर्चा होत होती. आजही महाराष्ट्रात काही प्रसिद्ध व्यक्ती गजाआड आहेत. तथापि, त्यांचे खटले न्यायप्रविष्ठ असल्यामुळे या दोन्ही प्रकारच्या रजांसाठी पात्र नाहीत.
नियमानुसार, खटला चालवून न्यायालयानं ज्यांना दोषी मानलंय, त्यांनाच पॅरोल किंवा फर्लोची सुविधा मिळू शकते. सप्तरंगी आध्यात्मिक गुरू आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख रामरहीमला मिळालेली रजा, त्यावर घेतले जात असलेले आक्षेप, या प्रकरणात घुसलेलं राजकारण आणि तो तुरुंगाबाहेर येताच चेव चढलेल्या त्याच्या अनुयायांनी धमक्या दिल्याचा आरोप, यामुळे हे शब्दार्थ पुन्हा चर्चेत आलेत.
पंजाब आणि हरियाणा वगळता रामरहीमकडे मनोरंजनाच्या हेतूनेच बघितलं जात असल्यामुळे संजूबाबाची चर्चा महाराष्ट्र वगळता इतरत्र जितक्या गांभीर्यानं झाली, तितकंच गांभीर्य रामरहीमच्या चर्चेला इतरत्र आहे. राजकारण्यांचं काय, ते कुणाच्याही सत्संगाला जातात. त्यामुळे त्याचंही कुणाला काही विशेष वाटलं नाही. मुद्दा एवढाच, की पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्यानं कोणतंही संचार माध्यम वापरायचं नाही असा नियम असताना हा पठ्ठ्या ऑनलाइन सत्संग कसे काय करतो? शिवाय रामरहीमला सोडताना कुणाकुणाची मतं विचारात घेतलीत, याबद्दलही अनेकजण साशंक आहेत. पॅरोल ज्याला द्यायचा आहे, त्याचं राहतं घर ज्या जिल्ह्यात आहे, त्या जिल्हाधिकाऱ्यांचं मत विचारात घेतलं जातं, असा नियम आहे.
याखेरीज ज्या-ज्या घटकांवर त्याच्या सुटकेमुळे परिणाम होईल, त्यांचाही विचार करावा लागतो. रामरहीमच्या सुटकेचा थेट परिणाम पंजाबात होऊ शकतो; परंतु हरियाणा सरकारने त्याचा विचारच केला नाही, असं संबंधितांचं म्हणणं आहे. विषयाचं गांभीर्य अचानक वाढवणारा घटक म्हणजे, आपण रामरहीमच्या सुटकेविरोधात आवाज उठवल्यानंतर त्याच्या अनुयायांनी आपल्याला धमक्या दिल्याचा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केलेला आरोप. सोशल मीडियावर त्यांना अभद्र भाषेत आलेले संदेशही त्यांनी शेअर केल्यामुळे गांभीर्य आणखी वाढलं.
पॅरोल रजा देताना संबंधित कैद्याची तुरुंगातली वर्तणूक तपासली जाते आणि तो बाहेर पडल्यावर तणाव वाढणार नाही, याचाही अंदाज घेतला जातो. याच रामरहीमवर कारवाई करण्यासाठी जेव्हा पावलं उचलली गेली, तेव्हा झालेली जाळपोळ आणि दंगल सर्वांना आजही आठवत असेल. असा कैदी पॅरोलवर बाहेर पडून जणू काही घडलंच नाही, अशा आविर्भावात सत्संग करतो आणि नेते-अधिकारी भक्तिभावानं श्रवणभक्ती करतात, हा चमत्कार केवळ आपल्याच भूमीत घडू शकतो.