-माधव विद्वांस
आद्य मराठी कीर्तनकार, पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि भागवतधर्म पंजाबपर्यंत नेणारे “संत शिरोमणी’ नामदेवांची आज पुण्यतिथी (आषाढ शुद्ध एकादशी, शके 1272).
त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात कार्तिक शु. 11 शके 1192 या तिथीस झाला. त्यांच्या पित्याचे नाव दामाशेटी तर आईचे नाव गोणाई होते. त्यांचे वयाच्या 11 व्या वर्षीच राजाईंशी विवाह झाला. त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र व लिंबाई नावाची एक मुलगी झाली. त्यांचे बालपण पंढरपुरात गेले. त्यांच्या बालभक्तीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. अवघे कुटुंबच विठ्ठल भक्तीमध्ये बुडालेले होते.
त्यांच्या घरात सर्वजण अभंग रचित असत. त्यांच्या घरातील सेविका संत जनाबाई कवयित्री होत्या. विशेष म्हणजे ज्या दिवशी नामदेवांनी समाधी घेतली त्याच दिवशी त्यांच्या घरातील एक मुलगा सोडून बाकी सर्वांनी सुमारे सोळा लोकांनी समाधी घेतली, तसेच त्याच दिवशी जनाबाईंनी पण इहलोकीची यात्रा संपविली. त्यांच्या काळातच ज्ञानेश्वर माऊलींनी नुकतीच भगवद्गीतेची गंगा प्राकृत मराठीत आणली होती. त्यांची कीर्ती ऐकून ज्ञानेश्वर वयाने लहान असूनही नामदेव कर्तृत्वाने आणि वयाने ज्येष्ठ असूनही ते स्वतः ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी आळंदीला गेले.
तिथे संत गोरा कुंभारांच्या नेतृत्वामध्ये जणू पहिले संतसंमेलन झाले. तेव्हा तेथे झालेल्या चर्चांमधून नामदेवांना भगवद्कार्यासाठी अधिक ज्ञान मिळवण्याची गरज लक्षात आली. त्यासाठी त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून देवाच्या सगुण निर्गुण रूपाविषयी स्पष्टता मिळवली. याच देवळात कीर्तन करताना त्यांचा पुरोहितांनी केलेला अपमानही त्यांना विचारांच्या वेगळ्याच वळणावर घेऊन गेला.
त्यानंतर ज्ञानेश्वर व नामदेवांनी एकत्रितपणे अनेक ठिकाणी फिरून भक्तिमार्गाचा प्रसार केला. संत नामदेवांनी “आदि’, “समाधी’ आणि “तीर्थावळी’ या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वर यांचे चरित्र सांगितले आहे. नारदमुनींना भारतात कीर्तन परंपरेचे जनक मानले जाते. मात्र, कालानुरूप यात अनेक बदल झाले. नारदीय परंपरेचे कीर्तन मंदिरात होते. मात्र नामदेवांनी हे कीर्तन चंद्रभागेच्या तीरावर सुरू केले.
नारदीय कीर्तनात पूर्वरंग आणि आख्यान असे दोन वेगळे विभाग असतात. मात्र, वारकरी संप्रदायात संतांच्या अभंगाचे गायन आणि त्यावर निरूपण केले जाते व टाळ मृदुंगाच्या घोषात 20-25 साथीदारांसोबत कीर्तन सादर केले जाते. नामदेवांनी आपल्या अभंगातून, कीर्तनातून नामस्मरणाचेच महत्त्व पटवून दिले. त्यावेळी समाज कर्मकांड-पूजा, मंत्र-तंत्र, बुवाबाजी, दांभिकता, अनीती आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेने ग्रासला होता. कीर्तन परंपरेतून समाजास अंधश्रद्धेपासून लोकांनी दूर राहावे अशी शिकवण दिली.
नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या. पंजाब, राजस्थान, गुजरात तसेच उत्तर प्रदेशातील तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचल, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. संत नामदेवांची 2 हजार 500 अभंग असलेली “अभंगगाथा’ प्रसिद्ध आहे, तसेच त्यांनी हिंदी भाषेत काही अभंगरचना केली. त्यातील सुमारे साठ अभंग शीख पंथाच्या “गुरू ग्रंथसाहिब’मध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत.
“अमृताहुनी गोड नाम तुझे देवा।’ या नामदेवांच्या अभंगाला माणिक वर्मा यांनी आवाज दिला आहे, तसेच “घालीन लोटांगण वंदीन चरण’ या आरतीमधील एका कडव्याने ते आजही आपल्याबरोबर सदैव आहेत. साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीपथावर समाधी घेतली व “पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली.