महाराष्ट्र वाहतूक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची गाडी वाहतूक लेनमध्ये अडकल्यामुळे त्यांना ऐच्छिकस्थळी जाण्यास विलंब झाला. त्यामुळे अवजड वाहनावरती पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात आहे. परिणामी दररोज मुंबई पुणे टोल नाका येथील उर्से आणि खालापूर या दोन्ही टोलनाक्यांवरती मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची गर्दी होत असून दोन-दोन तास वाहतूकदारांना टोलनाका पास करण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे, अशी तक्रार महाराष्ट्र वाहतूक पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच ठराविक अंतरापेक्षा अधिक अंतरावर वाहनांची रांग गेल्यास, त्या सर्व वाहनांना टोल न आकारता सोडण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र वाहतूक पंचायत वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील टोल बंद करण्यात यावा. कोविड -19 करोनांमुळे अडचणीत आलेल्या सर्व प्रकारच्या वाहतूकदारांना सरकारच्या वतीने आर्थिक मदत करावी.
फायनान्स कंपनी आणि बॅंकांच्या वतीने गुंडांमार्फत गाड्या ओढून नेल्या जात आहेत याबद्दल ठोस उपाय योजना राबवून वाहतूकदारांना दिलासा द्यावा. टोल रद्दची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक धारकांना टोल आणि रस्ते मध्ये खड्डे पडून होणारा त्रास आणि इतर त्यांचे प्रश्न तातडीने सोडण्यात यावे.
टोल नाक्यावर तातडीने पिवळे पट्टे मारून पिवळे पट्टेच्या बाहेर लाइन गेल्यास सर्व वाहनांना ताबडतोब टोल न आकारता सोडण्यात यावे.