खालापूर – आज पनवेल शहाराची अवस्था बघा. दररोज कोण येतंय, कोण जातंय, हे समजत नाही. परप्रांतीयांची लोकसंख्या वाढल्यावर हिंदी बोलावे लागेल, अशा धोक्याची घंटा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगत पनवेलनंतर कर्जत खालापूरातील जमिनी पोखरण्याचा काम परप्रांतीयांकडून होत आहे. जमीनी विकू नका यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याची पत्रकारांची जबाबदारी असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
अलिबाग येथील रायगड भूमी रक्षणाकरिता ‘जमीन परिषद च्या रायगड जिल्हा पत्रकार संवाद बैठकित ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबई, ठाण्यात परप्रांतीयांची मोठी लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे जमीनी विकत घेण्यासाठी परप्रांतीयांनी रायगड जिल्ह्याकडे मोर्चा वळविला आहे. कवडीमोल किमतीत मराठा बांधव जमिनी दलाला मार्फत विकत आहेत. जमिनी विकताना उद्योगात भागिदारी घ्या नाहीतर पुढील पाच वर्षानी आपली अवस्था वाईट असेल अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मुंबईला लागूनच रायगड जिल्हा आहे. एक्सप्रेस तसेच सागरी मार्ग असल्याने मुंबईत तासात पोहचू शकत असल्यामुळे भांडवलदार मुंबईला लागून असलेल्या जमिनींवर डोळा ठेवून गुंतवणूक करण्यासाठी रायगड जिल्ह्याकडे मोर्चा वळविला आहे. दलालांच्या मदतीने हजारो हेक्टर जमीनी विकत घेण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी राजकारण्यांचा हात आहे. राज्यावर ज्या मराठ्यांनी राज्य केले ते मराठे परप्रांतियांना जमीनी विकून त्याठिकाणी काम करीत असल्याने भविष्यात धोकादायक असणार आहे. यासंबंधीची माहिती देण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधत परप्रांतीय धनिकांवर निशाणा साधला. याप्रसंगी पक्षाचे उपनेते बाळा नांदगांवकर, आमदार राजू पाटील, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.
रायगडाची शेती वाचली पाहिजे, जमीन वाचली पाहिजे, येथील शेतकरी वाचला पाहिजे, जर जमीनी विकत असाल तर त्या जागेत होणार्या उद्योगात भागिदारी करा, तेथेच नोकरी मागू नका असेही राज ठाकरे यांनी अवाहन केले. जमीनी विकत घेण्यासाठी इतर राजकीय पक्षाचे लागेबांधे आहेत माझे कोणतेही व्यवहार नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगत महाराष्ट्रात जे उत्तम आहे ते हिसकावून घेण्याचे षड़यंत्र सुरू असल्याचे राज ठाकरे यांनी आरोप केले आहे. लोकांचा विश्वास आहे त्यामुळेच आपल्या माध्यमातून लोकांच प्रबोधन करण्याचे पत्रकारांची जबाबदारी असल्याचे राज ठाकरे शेवटी म्हणाले.
अलिबाग : रायगड भूमी रक्षणाकरिता आयोजित केलेल्या ‘जमीन परिषद’ दरम्यान बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे.