नवी दिल्ली – सध्या सुरु असलेल्या दशकात संपूर्ण जगात संघर्ष, सत्तापरिवर्तन आणि खडतर स्पर्धा यामुळे अशांतता निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताला स्थिर आणि परिपक्व नेतृत्व मिळणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर बोलत होते. आंतरराष्ट्रीत राजकारण आणि दोन देशांमधील समस्या सोडवण्यात मुत्सद्देगिरी दाखवलेल्या जयशंकर यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा सुमारे ५० वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे जयशंकर यांच्या विधानांना सखोल अर्थ प्राप्त होत असतो.
चीन आणि अमेरिकेचे राजदूत म्हणून काम केलेले आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सचिवाची भूमिका अनेक वर्षे निभावलेले जयशंकर म्हणाले की, आगामी काळात, नजिकच्या काही वर्षांत अनेक शेजारी राष्ट्रांमध्ये खूप संघर्ष, तणाव आणि विभाजनसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व घटकांना एकत्रित करून दशकाच्या समतोलतेसाठी एक अतिशय संघर्षमय आंतरराष्ट्रीय परिस्थिती सामोरी येणार आहे. अशा स्थितीत स्थिर राहून नि:पक्षपातीपणे अशा राष्ट्रांमध्ये समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी भारतावर पडू शकते. त्यासाठी भारतामध्ये बहुमताचे आणि स्थिर असे सरकार असणे आवश्यक आहे.
जयशंकर म्हणाले की, मला वाटतं की या सगळ्यांचा मेळ आज मोठ्या संघर्षाचं चित्र मांडत आहे. या संदर्भात, भारताला स्थिर आणि परिपक्व नेतृत्व मिळावे यासाठी मतदारांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीत सुज्ञपणे निवड करणे महत्त्वाचे आहे. माझा विश्वास आहे की आज देशातील मतदारांनी भारत सरकारचे नेतृत्व करण्यासाठी कोणावर विश्वास ठेवायचा आहे, हे स्पष्ट करुन सांगण्याची आवश्यकता नाही.
ही आहेत आव्हाने…
१. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचा प्रभाव कमी होत चालला आहे.
२. युक्रेनमधील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही.
३. इस्रायल-हमासचा गाझामधील संघर्ष थांबण्याची चिन्हे नाहीत.
४. चीनचे लाल समुद्रातील हल्ले वाढतच आहेत.
५. दक्षिण चीन समुद्रातील तणाव संपत नाही.
६. विविध भौगोलिक प्रदेशातील दहशतवादाचे आव्हान वाढते आहे.
७. विविध युद्धांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे.