लोणावळा – श्री नारायणी सेवा संस्थान, श्री नारायणी नारी चेतना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क बालग्राम, भाजे आणि संपर्क आशाघर, आंबवणे याठिकाणी अनाथ असलेल्या 50 मुले आणि 150 मुलींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. नारायणी सेवा संस्थेचे अनिल काशीप्रसाद मुरारका यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नारायणी धामचे व्यवस्थापक राजेंद्र महर्षी, पत्रकार संघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विशाल पाडाळे, प्रशांत पुराणिक, नारायणी धामचे हितेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री नारायणी सेवा संस्थानच्या वतीने दरवर्षी आदिवासी पाड्यांवरील आदिवासींना, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या गोर गरिबांना तसेच वेगवेगळ्या अनाथालयातील मुलामुलींना आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशी वेगवेगळ्या प्रकारचे मदत केली जाते. यावर्षी देखील लोणावळा शहरात थंडीचे दिवस सुरू होत असतानाच संपर्क बालग्राम, भाजे आणि संपर्क आशाघर, आंबवणे याठिकाणी जाऊन तेथील मुलामुलींसाठी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. तत्पुर्वी अनिल काशीप्रसाद मुरारका यांनी या मुलामुलींना खाऊचे वाटप केले.
आता थंडीचे दिवस सुरू होत असताना या ब्लॅंकेटचा उपयोग आम्हाला खऱ्या अर्थाने होईल अशी प्रतिक्रिया संपर्क बालग्रामच्या मुलींनी यावेळी दिली. तर येथील अनाथ आणि होतकरु मुलामुलींना भविष्यात देखील वेळोवेळी मदत करायला आनंदच होईल असे अनिल मुरारका यांनी सांगितले.
बक्षिस देऊन पाठीवर कौतुकाची थाप
संपर्क आशाघर येथील काही विद्यार्थ्यांनी खेळामध्ये विशेष प्राविण्य मिळविले. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा बक्षीस देऊन विषेश सत्कार केला. तर संपर्क आशाघर येथील मुलांनी देखील नैसर्गिक पानाफुलांचा वापर करून तयार केलेला सुबक गुच्छ मान्यवरांना भेट म्हणून दिला.