नाणे मावळ – केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असूनही सध्या बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत आहे. यामुळे नाणे मावळात उन्हाळी कांदाच्या रोपांना चांगली मागणी होत आहे. उन्हाळी कांदा लावणीच्या कामाला वेग आला आहे.
कांद्याच्या शेतीला कमी कालावधीत लागतो. सध्या बाजारात कांद्याला अधिक भाव मिळत आहे. त्यामुळे अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून नाणे मावळच्या गावातील शेतकरी उन्हाळी कांद्याचे पीक घेतात. या पिकाच्या लावणीला दरवर्षी सर्व शेतकरी भात काढणी झाल्यानंतर शेतीची मशागत करून साधारणतः एक महिन्यांनी सुरुवात करतात.
यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सर्व भाताची कापणी पूर्ण झाली होती. त्यामुळे, गेल्या आठवड्यासून नाणे मावळातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लावणीला सुरुवात केली आहे.
नेहमीपेक्षा यावर्षी कांद्याला बाजारभाव चांगले असल्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे क्षेत्र वाढवले आहे. त्यामुळे, लावणीसाठी मजूरांना मागणी वाढली आहे. यामुळे कांदा लावणीत मजूरांची कमतरता भासत आहे. मजूरांनी मजूरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढविल्यामुळे मजूर मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अनेक शेतकरी आपल्या घरच्या माणसांची अधिक मदत घेत आहेत, असल्याचे दिसून येत आहे.