लोणीकंद, (वार्ताहर)- शिरूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याचा चंग बांधल्याने आढळराव पाटलांच्या विरोधात असलेले मंत्री दिलीप वळसेपाटील व खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना शांत करण्यात अजित पवार यशस्वी झाले आहेत.
आज स्वतः अजित पवारांनी आढळराव पाटील यांचे नाव जाहीर केल्यानंतर शिरूर लोकसभेत विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात तुल्यबळ लढत होणार असल्याचे दिसत आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, आता जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. अद्याप महाविकासआघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा पेच सुटलेला नाही. दरम्यान, महायुतीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर मतदारसंघात लोकसभेच्या मैदानात उतरतील.
तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच उमेदवार असल्याचे ठरले आहे. आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवरून कोल्हेंनी टीकाही केलीय. “शिवाजीराव आढळराव पाटलांना चौथ्या पक्ष प्रवेशाच्या शुभेच्छा” असं म्हणत अमोल खोल्हेंनी खोचक टोला लगावला आहे.
6 पैकी 5 आमदार महायुतीकडे
शिरूर लोकसभे अंतर्गत येणार्या सहापैकी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, भोसरीचे आमदार महेश लांडगे, हडपसरचे आमदार चेतन तुपे हे महायुतीकडे तर शिरूरचे आमदार अशोक पवार हे एकमेव महाविकास आघाडीकडे आहेत.
पारनेरच्या आमदारांचा आढळरावांना फायदा?
पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटामध्ये असताना खासदार अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पारनेर मतदारसंघात झाले. या महानाट्यादरम्यान अमोल कोल्हे हे लंकेच्या संपर्कात असल्याने कदाचित कोल्हेंनीच लंकेचे मन परिवर्तन करून शरद पवार गटात प्रवेश करण्यास लावला असावा, असा समज संपूर्ण महाराष्ट्रसह अजित पवार यांचा देखील झाल्याचे बोलले जात आहे.
याचीच चीड मनात धरून अजित पवार हे कोल्हेंना पाडण्यासाठी अजून जीवाची बाजी लावणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या सर्व गोष्ठीचा फायदा मात्र आढळरावांनाच होणार असल्याचे दिसत आहे.