मलठण (वार्ताहर)- भारत देश सक्षम बनवण्याची हिंमत नरेंद्र मोदींमध्ये आहे. गेल्या दहा वर्षात देशाला एका उंचीवर नेण्याचे काम मोदींनी केले आहे. जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झाले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीतर्फे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली आहे. जर मला संसदेत काम करण्याची संधी जनतेने दिली, तर मी आपला विश्वास सार्थ ठरवेल, अशी ग्वाही महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा दौंड तालुक्यातील मलठण येथील गावभेट दौरा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार राहुल कुल म्हणाले की, गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत देशाने विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.
चांगले काम केले आहे. लोकहितासाठी व राज्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा धाडसाने निर्णय घेतला. बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे . त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांनी एकदिलाने काम करण्याची आपली जबाबदारी आहे.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी शेत मजूर महिला, मतदार, तरूणांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, पुणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, नंदुभाऊ पवार, कांचन कुल, विरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, ताराबाई देवकाते, उत्तम आटोळे, नागशेन धेंडे, घटक पक्षांचे पदाधिकारी, मतदार उपस्थित होते.