पुणे, दि. 24 -“छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांची हकालपट्टी करावी,’ अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. पक्ष सोडणार का? आंदोलन करणार का? या प्रश्नावर बोलताना उदयनराजे यांनी “पक्ष नक्कीच कारवाई करेल’ तर दि.28 नोव्हेंबरला आपली भूमिका स्पष्ट करू, असेही खासदार उदयनराजे यांनी सांगितले.
पुणे येथे पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. “सर्वधर्म समभावाचा विचार मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य करण्याचे धाडस काही जण करत आहेत. अशा प्रवृत्तींना ठेचून काढू,’ असा शब्दांत उदयनराजे यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्त्यांचा समाचार घेतला. हे वक्तव्य केले तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी निषेध का केला नाही? त्यामुळे सर्वपक्षीयांनी भूमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कधीच जुने होऊ शकत नाहीत. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच देशात लोकशाही टिकून आहे. मात्र, सध्या देशात मीपणा वाढला आहे. सामान्यांना न्याय मिळत नाही. महिलांचे तुकडे केले जात आहेत. यापुढे महाराजांचा अवमान केल्यास खपवून घेणार नाही,’ असा इशारा उदयनराजेंनी दिला.
पंतप्रधान मोदी यांना भेटणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत विचारले असता, “ते माझे मित्र असून, मी पक्षाचा खासदार म्हणून नाही तर एक शिवभक्त म्हणून विरोध करत आहे.’ याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटणार आहोत. पक्ष काय भूमिका घेतो, त्यावर आपली पुढील रणनिती असेल, असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता त्यांनी “कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा अवमान सहन केला जाणार नाही’ असे सांगितले.