पुणे, दि. 24 -खडकवासला धरणातील पाण्याचे वाटप पुणे शहर आणि जिल्ह्यातील सिंचन योजना तसेच शेतीला देण्याचा निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. 25) कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुणे शहरासाठी महापालिकेने यापूर्वीच शासनाकडे खडकवासला धरणातून 20.45 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. मात्र, जलसंपदा विभागाने जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या सूचना पुढे करत महापालिकेस 12.40 टीएमसी पाणी कोटा मंजूर केला असून महापालिकेस तो मान्य नाही. त्यामुळे महापालिकेच्या मागणीनुसार पुणेकरांना वाढीव पाणी देत पालकमंत्री पाटील पुणेकरांना दिलासा देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्री काय भूमिका घेणार…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्तीनंतरची पहिलीच कालवा समितीची बैठक आहे. महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी पालिकेत भाजपची सत्ता असताना पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात पुण्याचे पाणी तोडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी थेट तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडेच तक्रार केली होती. त्यानंतर पुण्याचे पाणी कमी करणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यातच आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्रिपद भाजपकडेच असून, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुणेकरांच्या घशाची कोरड भागणार की पुणेकरांची ओंजळ रिकामचीच राहणार हे पालकमंत्री पाटील काय भूमिका घेणार यावर ठरणार आहे.
शहरासाठी 20 टीएमसी पाण्याची गरज
दरवर्षी पावसाळ्यात ऑक्टोबर महिन्यात पाऊस संपल्यानंतर खडकवासला धरणसाखळीत शिल्लक असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन केले जाते. हा पाणीसाठा 15 जुलै अखेरपर्यंत पुरेल, असे हे नियोजन केले जाते. त्यात शहराला पिण्यासाठी, जिल्ह्यातील गावांना सिंचन योजनांसाठी तसेच शेतीसाठी पाणी वाटप केले जाते. या वाटपात पाण्याची गळती तसेच बाष्पीभवनाचाही समावेश केला जातो. महापालिकेचा पाणी वापर गेल्या तीन वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. 2019 मध्ये महापालिकेने 17 टीएमसी पाणी धरणातून उचलले तर 2020 मध्ये 18 टीएमसी तर 2021 मध्ये हा पाणी वापर जवऴपास 20 टीएमसीवर गेल्याचा पाटबंधारे विभागाचा दावा असून, महापालिकाही तो नाकारत नाही. त्यामुळे शहराची मागणी 20 टीएमसीची असताना पालिकेच्या ओंजळीत किती पाणी मिळणार, हे आजच्या बैठकीत ठरेल.