पुणे, दि. 24 -शहरातील प्रवाशांना अपुऱ्या बसच्या संख्येमुळे सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा देण्यात अपयशी ठरलेल्या पीएमपीकडून राजकीय नेत्यांच्या हट्टापायी मागील दोन वर्षांत शहरी बस सेवेचा विस्तार जिल्ह्यातील ग्रामीण भागात केला होता. मात्र, या निर्णयामुळे पीएमपीची संचलन तूट लक्षणीय प्रमाणात वाढत असल्याने आधीच दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या पीएमपीला आणखी आर्थिक नुकसान होत असल्याने ग्रामीण भागातील सेवेला ब्रेक लावण्यास पीएमपीने सुरुवात केली आहे. त्यानुसार, येत्या शनिवार (दि. 26) पासून जिल्हातील 11 मार्गांवरील सेवा बंद केली जाणार आहे. पीएमपीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपीच्या कारभारात सुधारणा करण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील वर्षी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या संप कालावधीत पीएमपीकडून ग्रामीण भागात नव्याने 40 मार्गांवर बस सेवा सुरू केली होती. पण, शहरात बसची संख्या कमी असताना ग्रामीण भागात पीएमपी सेवा का दिली जाते, अशी ओरड शहरातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थाकडून केली जात होती. तसेच शहरात वाहतूक सेवा सुरळीत करण्याची मागणी केली जात होती. तसेच पीएमपीची संचलन तूट देखील 720 कोटींवर गेली आहे. ही संचलन तूट कमी करण्यासाठी बकोरिया यांनी प्रयत्न सुरू केले असून, बसमार्ग संचलनासाठी येत असलेला खर्च व या मार्गांपासून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असलेले मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागातील बस मार्ग बंद करण्यात आल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 28 नोव्हेंबरपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील 11 मार्गांवर जादा बसचे नियोजन करण्यात आलेले आहे.
– दत्तात्रये झेंडे, वाहतूक व्यवस्थापक