कोयनानगर (प्रतिनिधी) – आधी धरण नंतर पुनर्वसन ही लोकप्रतिनिधींची भूमिका होती. मात्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून धरणांची कामे करत असताना धरणाचे काम आणि पुनर्वसन एकाच वेळी सुरू राहिले पाहिजे अशी मी भूमिका घेतली. त्यानंतर सध्याचा पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
हेळवाक रासाटी, ता. पाटण येथे महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मिळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार ,गोविंद कुराडे, बबन पाटील, निजामभाई, भैयासाहेब पाटणकर, शंतनु भुमकर, अशोकराव पाटील, प्रदीप पाटील, नंदकुमार सुर्वे ,भैयाजी शेळके, हेमंत कापले यांची उपस्थिती होती.
उदयनराजे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा करणारे कोयना धरण नसते तर महाराष्ट्र अंधारात असता. या परिसरात राहणाऱ्या लोकांचे मोठे उपकार महाराष्ट्रातील जनतेवर आहेत. कोयना धरण बांधले जात असताना जनतेने कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत.
घरादाराची परवा न करता धरणा करता जमिनी दिल्या. त्यावेळच्या राज्यकर्त्यांवर लोकांनी विश्वास ठेवला. मात्र इतर धरणांची कामे सुरू असताना धरण आणि पुनर्वसन या बाबी एकाच वेळी केल्या जाव्यात असा मी आग्रह धरला. त्यातूनच पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला.
शंभूराज देसाई म्हणाले, राज्य शासनाने कोयना जलपर्यटनासाठी साडेतीनशे कोटींचा आराखडा तयार केला. मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात आले. कोयना भागातील पर्यटन वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 68 कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामध्ये पर्यटकांना जवळून कोयना परिसरातील निसर्ग पाहता येईल.
आचारसंहिता संपताच या भागातील पर्यटन आराखड्याच्या अनुषंगाने पहाणी दौरा केला जाणार आहे. या भागातील जनतेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी महायुतीच्या सरकारने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजेंच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करावे असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले.
कमळ धनुष्यबाणाचे साटेलोटे
आपल्या सर्वांना केवळ धनुष्यबाणाचे चिन्ह लक्षात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेचे साटेलोटे आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपला आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मदत करायची आहे. असे ही शंभुराज देसाई यांनी सांगितले.