राज्य शासनाच्या धोरणावरून विद्यार्थ्यांत संतापाची लाट
पुणे – मजूर, विद्यार्थी यांच्यासाठी मोफत एसटी सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने विद्यार्थ्यांना सवलत न देता उलट दुप्पट दराने तिकीट आकारणी केल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आता घरी कसं जायचं, असा प्रश्न पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांपुढे पडला आहे.
लॉकडाऊनमुळे पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सुमारे तीन हजारांहून अधिक विद्यार्थी अडकून पडले आहेत. मेस बंद असल्याने या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल सुरू आहे. तिकिटापुरतेही पैसे जवळ नसल्याने मोफत गावी जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर एमपीएससी स्टुडंट राईटस आणि पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पाठपुरावा केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्याची सोय होईल, अशी आशा होती. एवढेच नव्हे, तर दि. 11 मेपासून या विद्यार्थ्यांना मोफत घरी जाण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
दरम्यान, राज्य शासनाने रविवारी काढलेल्या आदेशात राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत एसटी प्रवास मोफत सुरू करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. त्यात विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यावरून विद्यार्थ्यांमध्ये संताप पसरला आहे.
विद्यार्थी संघटना म्हणतात…
राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा संवेदनशीलतेने विचार करायला हवा. एका रात्रीत निर्णयात बदल करून राज्य सरकारने विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. विद्यार्थ्यांना तातडीने मोफत गावी जाण्याची व्यवस्था करावी आणि सरकारने हा निर्णय रद्द करून मोफत एसटी सेवा करावी, अशी मागणी एमपीएससी स्टुडंट राईट्सचे महेश बडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.