फलटण – महायुतीचे नक्की काय होईल? फलटण मतदारसंघ कुणाकडे जाईल, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; परंतु दिगंबर आगवणे यांना महायुतीचे तिकीट मिळाले नाही तरी त्यांना अपक्ष उमेदवारी करू देणार नाही, असे माढ्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
ठाकुरकी येथे नुकत्याच झालेल्या महामेळाव्यात ते बोलत होते. दिगंबर आगवणे, भाजप, शिवसेना, रासप, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी जनता अदालत काय असते हे मी फलटणकरांना दाखवून दिले आहे. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व अधिकारी उपस्थित होते. फलटणचे राजे काही दिवसांपासून महायुतीच्या दारात फिरत आहेत. त्यांनी जसे शरद पवार यांना फसवले, तसेच ह्यांचे कार्यकर्ते ह्यांना फसवतील, यात शंका नाही. फलटण तालुक्याचा आमदार आपलाच असेल. सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मी खासदार झाल्यापासून विकासकामांचा फक्त ट्रेलर दाखवला आहे. महायुतीत ही जागा ज्या पक्षाला मिळेल, त्याचाच प्रचार आपल्याला करावा लागेल.
दिगंबर आगवणे म्हणाले, मीच उमेदवार असेन, असे गृहीत धरू नका. माझी विधानसभा निवडणूक लढण्यासारखी परिस्थिती नाही. तालुक्यातील सत्ताधारी मंडळींना घरी बसवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मी आ. दीपक चव्हाण यांना चारच प्रश्न विचारतो. त्यांची उत्तरे त्यांनी लगेच दिली तर आपण त्यांना बिनविरोध आमदार करू. मी कोणत्या पक्षात जायचे, हे रणजितसिंहच ठरवतील. पक्ष कोणताही असो माझी लढत राजे गटाच्या विरोधातच असेल.
दरम्यान, खा. रणजितसिंह बोलण्यासाठी उभे राहिले असताना दिगंबर आगवणे यांना महायुतीचे तिकीट मिळवून द्या, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांमधून झाली.