इस्लामपुरात महायुतीची उमेदवारी नेमकी कुणाला?
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. इस्लामपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजप जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असे म्हणत मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. जयंत पाटील विरोधकांच्या सर्वपक्षीय विकास आघाडीतूनच त्यांना टोकाचा विरोध आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात लढण्याची जोरदार तयारी केली असली तरी त्यांना विविध पातळ्यांवर रोखण्यासाठी एक गट सक्रिय झाला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष शाकीर तांबोळी यांची उमेदवारी घोषित झाली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी इस्लामपूर मतदारसंघात कॉंग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. इस्लामपूर मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेकडे आहे; पण चर्चेत अनेकदा जयंत पाटील यांच्या विरोधात युतीतील सर्व गट अनेकदा पक्ष संघटना बाजूला ठेवत एकच उमेदवारी देतात, ही वस्तुस्थिती आहे.
2016 मध्ये झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वपक्षीय विकास आघाडी झाली. परिणामी त्यांच्या पदरात चांगले यश पडले. दरम्यानच्या काळात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला.
विकास आघाडीत फूट पडली. आता हीच विकास आघाडी निशिकांत पाटील यांना जमेत न धरता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे. या निवडणुकीत जयंत पाटील यांना कोण चांगले आव्हान देऊ शकेल, याची चाचपणी सुरू आहे. 2009 मध्ये हुतात्मा समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात चांगली लढत दिली होती. तोच धागा पकडून आताही त्यांनाच पुढे करण्याचे प्रयत्न आहेत. आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, आम्ही त्याला निवडून आणू, असे वक्तव्य विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत नेत्यांनी केले होते. त्यानंतर समन्वय समिती स्थापन करून शिवसेनेचे आनंदराव पवार व गौरव नायकवडी यांची नावे पुढे करण्यात आली आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव माने हे समन्वय समितीचे अध्यक्ष असून भाजपचे युवा मोर्चाचे सागर खोत, विक्रम पाटील, राहुल महाडिक, शिवसेनेचे आनंदराव पवार व गौरव नायकवडी हे सदस्य आहेत. यापैकी कोणत्याही नेत्याने निशिकांत पाटील यांचे नाव घेतले नाही. मात्र, निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना वेळोवेळी आव्हान दिले आहे. इस्लामपूर मतदारसंघात चांगली संपर्कयंत्रणा राबवून निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली आहे. मतदारसंघात लागलेल्या “अबकी बार, दादा आमदार’ या डिजिटल फलकांची दखल खुद्द राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही एका दौऱ्यात घेतली होती. डिजिटल बोर्ड लावून कुणी आमदार होत नसते, त्यासाठी लोकांची कामे करावी लागतात, असा टोला त्यांनी भाषणात लगावला होता.
निशिकांत पाटील यांना विविध पातळ्यांवर घेरण्याचे प्रयत्न सुरू असताना ते “एकला चालो रे’च्या भूमिकेत आहेत. वैभव नायकवडी यांना भाजपमध्ये आणण्यासाठी विकास आघाडी प्रयत्नशील आहे. 2009 मध्ये जयंत पाटील यांना 1,10,673 तर नायकवडी यांना 56,165 मते पडली होती. नायकवडी हे जयंत पाटील यांच्याविरोधात सर्वाधिक मते घेणारे उमेदवार ठरले आहेत. पाटील यांना सहा वेळच्या निवडणुकीत सर्वात कमी मताधिक्य त्याच निवडणुकीत मिळाले होते. वैभव नायकवडी भाजपमध्ये आल्यास विकास आघाडीत गौरव नायकवडी यांच्या नावाला सहमती मिळण्याचे संकेत
चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारली जबाबदारी
जयंत पाटील यांच्या पराभवासाठी आपण स्वतः जबाबदारी घेणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे, यात शंका नाही.