जामखेड – या भागाचे आमदार तथा मंत्री राम शिंदे हे स्वत:ला ओबीसीचे नेते म्हणवून घेत असतील, तर त्यांनी ओबीसींच्या न्याय्यहक्कांसाठी विधानसभेत अथवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधीच आवाज उठवला नाही. मग ते ओबीसींचे नेते कसे म्हणवून घेतात ? असा सवाल करत युतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत ओबीसी महामंडळाला एक रुपयाचाही निधी दिला नाही, असा आरोप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने तालुक्यातील नान्नज व जवळा येथे सभा झाल्या. त्यात भुजबळ बोलत होते. यावेळी उमेदवार रोहित पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेशस रचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, सूर्यकांत मोरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
भुजबळ यांनी या भागाचे आमदार तथा मंत्री राम शिंदे हे स्वत:ला ओबीसींचे नेते म्हणवून घेत असतील, तर त्यांनी ओबीसींच्या न्याय्यहक्कांसाठी विधानसभेत अथवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधीच आवाज उठवला नाही. मग ते ओबीसींचे नेते कसे म्हणवून घेतात? असा सवाल करत युतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत ओबीसी महामंडळाला एक दमडा दिला नाही. ओबीसी म्हणून चालत नाही. तुमचे कर्तृत्व किती, यावरच तुमचे नेतेपण ठरते, असा टोला शिंदे यांना लगावला. जेव्हा मी ओबीसींचे प्रश्न मांडत होतो, तेव्हा शिंदेंनी कधीच पाठबळ दिला नाही.शिंदेंचे कर्तृत्व पाहता ते अहिल्यादेवींचे कधीच वारस होऊ शकत नाही, असे भुजबळ म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, दुष्काळात पाणी पोहचवण्याची जबाबदारी मंत्र्यांची होती. मात्र मंत्र्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या बगलबच्चांनी पाण्याचे राजकारण व व्यावसायिकरण केले. नान्नज, जवळा या भागातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.