टाकळी हाजी -टाकळी हाजी गावात धारावी (मुंबई) येथून 12 नागरिक व इतर ठिकाणांहून अजून व्यक्ती आल्याने गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, निघोज या गावात करोनाचा रुग्ण सापडल्याने गावात 100 टक्के बंद पाळला होता; परंतु तरीसुद्धा छुप्या मार्गाने बाधित क्षेत्रातील व परजिल्ह्यातील लोकांनी गावाकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे बेट भागातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
आरोग्य अधिकारी प्रदीप बिक्कड म्हणाले, संबंधित सर्वांची आरोग्य तपासणी केली आहे. त्यांना सर्व सुविधांयुक्त ठिकाणी क्वारंटाइन केले असल्याने नागरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही. तसेच, सर्व नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिचे नियम पाळून करोनाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन बिक्कड यांनी केले.
टाकळी हाजी गावाच्या शेजारील गावात करोनाचा रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून गावात 100 टक्के बंद असून फक्त अत्यावश्यक सेवा (दवाखाना व मेडिकल) सुरू असून इतर दुकाने व सर्व व्यवहार बंद आहेत. सर्वांनी नियमांचे पालन करावे तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे यांनी सांगितले.