पारनेर (शशिकांत भालेकर)- तालुक्यातील वडनेर हवेली या गावामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 40 लाख रुपये खर्चून जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यामुळे आज वडनेर हवेलीत पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून, ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे गाव टॅंकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे.
मागील वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वडनेर हवेली येथे चाळीस लाखांहून अधिक रुपयांची कामे लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आली. यातून जलसाठे निर्माण करण्यात आले. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने तयार केलेले हे जलसाठे भरले होते. दुष्काळी गाव म्हणून पाहिले जाणारे वडनेर हवेली पाणीदार झाले होते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर देखील झाला. शेतकऱ्यांनी कांदा व इतर नगदी पिके घेतली.
दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चणचण गावाला भासायची गेल्यावर्षी अनेक महिने गावास टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र यावर्षी परिस्थिती बदलली असून, अद्याप पिण्याच्या पाण्याची स्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली. त्यात कांदा, भुईमूग, भाजीपाला पिके घेतली. सध्या 35 टक्के क्षेत्र हे उन्हाळ्यातही ओलिताखाली आहे. ग्रामस्थ पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे खूष असून, अशी कामे दरवर्षी व्हावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे. कधी नव्हे ते उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागली नाही. गावाने ठरवले तर दुष्काळ मुक्ती शक्य आहे, हेच वडनेर हवेलीने दाखवून दिले आहे.
दहा लाखांचे मिळाले होते बक्षीस
वडनेर हवेली हे गावाने गेल्यावर्षी पाणी फाऊडेशन स्पर्धेमध्ये राज्यात सातवा क्रमांक, तर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. त्याद्वारे गावाला दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. तसेच जलसंधारणाच्या कामांमुळे गावातील पाणीपातळी वाढून दुष्काळाला बाहेर ठेवण्यात गाव यशस्वी ठरले आहे.