पुरंदर -शासनाने ग्रामीण भागातील लोकांच्या सुरक्षेसाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संकटाच्यावेळी हे सुरक्षादल लोकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. त्याचबरोबर हेच सुरक्षा दल निसर्गाच्या रक्षणासाठी सुद्धा प्रयत्न करीत आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी मध्यरात्री डोंगराला लागलेली आग मोठ्या प्रयत्नाने विझवली आहे. रात्रीच्या काळोखात प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामसुरक्षा दलाच्या जवानांनी आग विझविल्याने निसर्गसंपदेचे नुकसान टळले आहे.
पुरंदर तालुका हा डोंगर दऱ्याचा तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात येथील डोंगराना वणवा लागण्याचे प्रकार अनेकवेळा घडतात. शुक्रवार (दि.8) पिंगोरी येथील डोंगराला मोठी आग लागली होती. दुपारी लागलेली आग वनविभागाने विझवली.
मात्र, रात्री 11 वाजता ही आग पुन्हा भडकल्याचे लक्षात आले. यावेळी पिंगोरी गावचे पोलीस पाटील राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 तरूणांनी ही आग विझवून निसर्गाचे व वन्यजीवांचे होणारे नुकसान टळले आहे. सात ते आठ फूट उंच असलेल्या ज्वाला असलेली आग जवानांनी मोठ्या धैर्याने विझवली. त्यामुळे तरूणांचे कौतुक करण्यात येत आहे.
ही आग विझविण्यासाठी सिद्धार्थ शिंदे, दिनेश भोसले, संभाजी पवार, अक्षय चव्हाण, महेश शिंदे, प्रणव शिंदे, ओंकार शिंदे, किरण शिंदे, महेश शिंदे, शिवम शिंदे, रवींद्र शिंदे, अमोल शिंदे, राजेंद्र शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
तरूणाच्या अथक प्रयत्नानंतर इतर वनसंपदा नष्ट होण्यापासून वाचली आहे.