नवी दिल्ली – दिल्लीत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा विश्वास आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. आज त्यांनी आपल्या पत्नी सुनिता आणि मुलगा पुलकित यांच्या समवेत सिव्हील लाईन्स भागातील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर ट्विटवर त्यांनी म्हटले आहे की आज आपल्या मुलाने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. सर्वच युवकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाहीं बळकट करावी असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान केजरीवालांचे चिरंजीव पुलकित याला पत्रकारांना पुढील मुख्यमंत्री कोण होणार असे विचारता तो म्हणाला की लोक ज्याला निवडून देतील तो दिल्लीचा मुख्यमंत्री होईल. तत्पुर्वी केजरीवालांनी दिल्लीतील महिलांनाही मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडा असे आवाहन करताना कोणाला मतदान करायचे हे आपल्या घरातील पुरूषांशीही चर्चा करून ठरवा असे आवाहन केले त्यांच्या या ट्विटला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार आक्षेप घेतला. महिलांना स्वत:च्या विचाराने मतदान करता येत नाही अशी समजूत केजरीवालांनी करून घेतली आहे हा महिलांचा अवमान आहे असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांनतर त्यांनी म्हटले आहे की आपल्या मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भवितव्याचा विचार करून लोकांनी मतदान केले पाहिजे. निवडणुकीत शाहीनबाग आंदोलनाचा काय परिणाम होईल असे विचारता ते म्हणाले की यावेळी लोक मुलांच्या चांगल्या शिक्षणाच्या मुद्द्याचा विचार करून मतदान करतील. बाकीचे विषय ते मनावर घेणार नाहीत असे भाष्य त्यांनी केले.