मुंबई : राज्यातील राजकारणाने एका रात्रीत अचानक सर्व चित्र बदलले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे वाटत असतानाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सत्तेसाठी आता बहुमत सिद्ध करण्याची परिक्षा असणार आहे. त्यासाठी फडणवीस सरकारला येत्या 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले. यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले.
आता राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगत अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, आता स्थापन करण्यात आलेल्या सरकारला आता आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही बहुमत सिद्ध करू आणि पाच वर्ष सरकार यशस्वीपणे काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.