शिरगाव – कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला नुकतीच सुरूवात झाली. त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून ऊसतोड कामगार आपल्या मुलाबाळांसह कारखान्यावर दाखल होत आहेत. ग्रामीण भागात पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याने यंदा अपेक्षेपेक्षा जास्त कामगार आल्याचे दिसत आहे.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याबाहेर दाखल झालेले ऊसतोड कामगारांमध्ये बहुतांश कामगार हे बीड, उस्मानाबाद, लातूर, धुळे, जळगाव, चाळीसगाव, जालना, औरंगाबाद, नांदेड, मराठवाडा व खानदेश भागांतील आहेत. यावर्षी पावसाने या भागात हजेरी दरवर्षीपेक्षा कमी लावल्याने येथील कामगार आपल्या शेतीतील कामे आटोपून ऊसतोड करण्यासाठी आले आहेत. खरीप हंगामातील आपल्या शेतात आलेले पिक काढून घेऊन रब्बी हंगामाची खात्री नसल्याने हे कामगार ऊस तोडणीच्या कामावर दाखल होत आहेत.
मागील वर्षी पाऊस समाधानकारक झाला होता. परंतु, यंदाच्यावर्षी सर्व अपेक्षा फोल ठरली. उन्हाळ्यातही या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने बहुतांशजण शहराच्या आसपासच रोजगार शोधणार आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त कामगार ऊसतोड करण्यासाठी दाखल झाले आहेत. या कामगारांना अधिकाधिक ऊसतोडणी करून जास्तीत जास्त पैसा मिळवून आपली परिस्थिती सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
सध्या कारखाना परिसरात कामगार हे बैलगाडी, टायर गाडी, ट्रॅक, ट्रॅक्टर आदींद्वारे दाखल झाले असल्याने या सर्व ऊसतोड कामगारांमुळे कारखान्याचा परिसर गजबजला असून सर्व कामगारांनी राहण्यासाठी झोपड्या उभा केल्या आहेत. गळीत हंगाम दिवाळीपूर्वीच सुरू झाल्याने कामगारांना यंदाची दिवाळी घरापासून दूर म्हणजे कारखान्याच्या परिसरातच साजरी केली.
शिक्षणसाठी मुले गावीच
काही ऊसतोड कामगारांनी आपल्या मुलांना सोबत आणले नाही. गावी आजी-आजोबांना सोबत तसेच मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आपण मुलांना आणले नसल्याचे ऊसतोड कामगार सांगत आहेत. मात्र दररोज संध्याकाळी मुलांशी तसेच आई-वडिलांशी मोबाइलद्वारे संपर्क साधत असल्याचे या कामगारांनी सांगितले.