पुणे – समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेने निवासी सोसायट्या, तसेच स्वतंत्र घरांना पाण्याचे मीटर बसवले आहेत. अशा मिळकतींमध्ये प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंत पाणी वापरणे आवश्यक आहे. पण, प्रत्यक्षात त्यापेक्षा जादा पाणी वापरण्यात येत आहे. याची कारणे शोधण्यासह पाणी मर्यादेत वापरण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश पाणीपुरवठा विभागास दिले आहेत. दरम्यान, शहरात सुमारे 2 लाख 80 हजार पाणीमीटर बसवण्यात येणार असून, आतापर्यंत सुमारे 1 लाख 62 हजार पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शहरात नव्याने 1,600 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. पाणी पुरवठ्यासाठी शहराचे स्वतंत्र झोन तयार करण्यात आले आहेत.
त्याअंतर्गत प्रत्येक झोनमधील टाकीत सोडले जाणारे पाणी तसेच प्रत्यक्षात मीटरमधून नागरिकांच्या घरापर्यंत जाणाऱ्या पाण्याचा हिशेब ठेवला जात आहे. त्यामुळे जलवाहिनीत होणारी पाण्याची गळती तसेच मीटरमधून घेण्यात येणारे पाणी याची तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोणत्या मिळकतींमधे किती पाणी दिले, कोणत्या मीटरमध्ये जादा पाणी घेतले गेले, कोणत्या मीटरमधून अचानक पाणी घेणे कमी करण्यात आले, ही माहिती एका क्लिकवर समोर येत आहे. या मीटर ऑडिटमध्ये अनेक मिळकतींमधील पाणी वापराची माहिती समोर आली आहे.
तातडीनं सर्वेक्षण करणार
ज्या भागातील मिळकतींचा पाणीवापर जास्त आहे, तेथे पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंत्यानी तातडीने सर्वेक्षण करायचे आहे. पाणी वापर जास्त असल्याची कारणे शोधायची असून, संबंधितांना पाणी कमी वापरण्याच्या सूचना द्यायच्या आहेत. या सर्वेक्षणात पाण्याच्या टाकीची गळती, संबंधित मिळकतींमधील नागरिकांची संख्या, जलवाहिनीची गळती अशा बाबींचे सर्वेक्षण करून जादा पाणी वापराचीकारणे असणारा अहवाल सादर करायचा आहे.