भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. या दोन संघांतील मर्यादीत षटकांच्या मालिका संपल्या असून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटीही पार पडली आहे. ही कसोटी भारतीय संघाने एक डाव आणि 32 धावांनी गमावली असून आता आजपासून (बुधवार) सुरु होत असलेली कसोटी जिंकत मालिका बरोबरीत ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान राहील. मात्र, त्यासाठी भारतीय फलंदाजीत तंत्रशुद्धता येणे गरजेचे आहे ती येणार का हाच मोठा प्रश्न आहे.
आयपीएल, टी-20 तसेच एकदिवसीय अशा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटच्या डोसवर पोसल्या जात असलेल्या या पीढीमध्ये विक्रमादीत्य सुनील गावसकर नाही पण किमान राहुल द्रविड तरी गवसावा ही अपेक्षा होती. कारण खुद्द द्रविडच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक होते व आज तेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. आपल्याकडे सक्षम सेकंड बेंच आहे असेही ते सातत्याने सांगत होते मात्र, हा सेकंड बेंच केवळ मर्यादीत षटकांच्या सामन्याच्या पात्रतेचा आहे हे सेंच्युरीयनला झालेल्या पहिल्या कसोटीत दिसून आले.
आता केपटाऊनला दुसरी कसोटी खेळायची आहे. या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे परंतू हे इतिहासात रमण्याचे दिवस नाहीत. नवे वर्ष, नवी इनिंग सुरु करावी लागण्याचे दिवस आहेत. आपल्या आधीच्या खेळाडूंनी काय केले त्या पूर्वपुण्याईवर आताचा संघ जिंकू शकत नाही. घराणेशाहीवर राजकारण चालते क्रिकेटचा संघ नव्हे.
आपला ऑफ स्टम्प कुठे आहे हे समजणारा फलंदाज आज आपल्या संघात नाही हे विधान मी संघात विराट कोहली असतानाही करत आहे कारण तो एकटा संपूर्ण संघाचा भार किमान कसोटीत वाहू शकत नाही. कोहलीला साथ देण्यासाठी लोकेश राहुल, रोहित शर्मा यांनाही अत्यंत जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. कसोटीत आज आपल्याकडे सचिन नाही, द्रविड नाही, लक्ष्मण नाही किंवा कसोटीतही पहिल्या चेंडूपासून चौकारांसह शिखरे उभी करणारा सेहवागही नाही.
शुभमन गिल आणि कंपनीला ही कसोटी आहे आयपीएल किंवा केवळ टी-20 वा एकदिवसीय लढत नव्हे हे कधी समजणार. सेकंड बेंच सक्षम असणे म्हणजे काय हे ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लेबुशेन, मिशेल मार्श यांच्याकडे पाहून लक्षात येते. दुसरी कसोटी जिंकून प्रतिष्ठा राखायची असेल तर द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली नेटमध्ये सराव करताना तंत्रावरच भर द्यावा लागेल व प्रत्यक्ष सामन्यात फलंदाजीत प्रत्येक चेंडू खेळताना तंत्रशुद्धताच आणावी लागेल.