केपटाऊन – भारत व यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून येथे दुसरी कसोटी सुरु होत आहे. संघातील नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली या प्रस्थापितांसह नवोदित खेळाडूंसाठीही ही मोठी परिक्षा ठरणार आहे. हा सामना गमावल्यावर मालिका तर गमवावी लागणारच आहे परंतू कसोटी स्तरावर जागतिक वर्चस्वाचे जे तुणतुणे बीसीसीआय़ वाजवते हे फुसके ठरणार आहे.
आजवर म्हणजे 1992 सालापासून भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे अनेक दौरे केले मात्र, एकदाही कसोटी मालिका जिंकू शकलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकणे हेच प्रत्येकवेळी मोठे मानले जात होते आता त्यात हा संघही अपवाद नाही. कारण पहिली कसोटी डावाने गमावल्यामुळे आता मालिका जिंकणे शक्यच नाही परंतू ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत राखण्याची संधी आहे.
भारताच्या फलंदाजीत फार मोठे बदल होतील असे वाटत नाही कारण सध्या दौऱ्यावर असलेल्या संघात फार पर्यायही नाहीत. मात्र, गोलंदाजीत काही बदल होणार आहेत. त्यात प्रसिद्ध कृष्णाच्या जागी रवींद्र जडेजा संघात परतेल. प्रमुख गोलंदाज महंमद शमी नसल्याने वेगवान गोलंदाजीचा प्रमुख भार जसप्रीत बुमराह व महंमद सिराज यांच्यावरच राहणार आहे. शार्दुल ठाकूर पुर्ण मॅचफिट ठरला असला तरीही त्याच्या जागी आणखी एक अष्टपैलु अभिमन्यु इश्वरन याला संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय संघातील फलंदाजांना विशेषतः रोहित, राहुल, कोहली, गिल, जयस्वाल व श्रेयस अय्यर यांना दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीचा अत्यंत जबाबदारीने सामना करावा लागणार आहे. कागिसो रबाडा, मार्को जेन्सन व नांद्रे बर्गर यांनी पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजी नेस्तनाबूत केली होती आता या कसोटीत भारतीय फलंदाज त्यांचा सामना कसा करतात हेच पाहणे महत्वाचे ठरेल.
लक्षवेधी
– या दोन संघातील ही 44 वी कसोटी
– यापूर्वीच्या 43 कसोटीत दक्षिण आफ्रिका वरचढ
– दक्षिण आफ्रिका 18 वेळा विजयी
– भारत 15 सामन्यांत विजयी
– 10 सामने अनिर्णित
– गेल्या पाच लढतीतही भारत पिछाडीवर
– दक्षिण आफ्रिका 3-2 आघाडीवर
– या मालिकेतही 1-0 आघाडीवर
– भारताचा दक्षिण आफ्रिकेत अद्याप कसोटी मालिका विजय नाही
– 23 कसोटीत केवळ 4 विजय
– हे चारही विजय वेगवेगळ्या मालिकांमध्ये
गिलसाठी अखेरची संधी ठरेल
भारताचा नवोदित सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याच्यासाठी ही कसोटी अखेरची संधी ठरेल असे संकेत मिळत आहेत. त्याने गेल्या मोसमापासून सातत्याने सरस कामगिरी केली आहे. मात्र, जी काही कामगिरी केली ती सर्वात जास्त मर्यादीत षटकांच्या सामन्यात केली आहे. कसोटीत त्याला फारसे यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे त्याची जागा धोक्यात आली आहे. त्याने या कसोटीत दोन डावांत चमक दाखवली नाही तर इंग्लंडविरुद्ध त्याला संधी मिळेल का याची खात्री सध्यातरी कोणी देणार नाही.