भारताचा युवा क्रिकेट संघ (19 वर्षांखालील) सध्या युवा विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. या संघात एक युवा डावखुरा फिरकी गोलंदाज तुफानी कामगिरी करत आहे. सौम्य पांडे हे या युवा खेळाडूचे नाव. येत्या काळात हा अष्टपैलु गोलंदाज भारताच्या प्रमुख राष्ट्रीय संघात रवींद्र जडेजाची जागा घेऊ शकतो.
यंदाचा युवा विश्वकरंडक अद्याप संपलेला नाही मात्र, त्यात भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या अवघ्या पाच सामन्यात 13 बळी घेतले आहेत. त्याची या स्पर्धेतील डावखुरी फिरकी गोलंदाजी पाहिल्यावर पहल्या दमात रवींद्र जडेजा व कुलदीप यादवचीच आठवण येते. त्याची गोलंदाजीची शैली, रीदम, हायआर्म अक्शन, फ्लाइट देण्याचे धाडस व दीशा आणि टप्पा यांवरील नियंत्रण दैवी असल्यासारखे वाटते. या व्यतरीक्त त्याच्या भात्यात दोन आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे समोरच्या फलंदाजाने चौकार किंवा षटकार फटकावला तरीही तो त्याची दीशा बदलत नाही. आणि दुसरे म्हणजे एका षटकात कीतीही धावा काढल्या गेल्या तरीही निराश न होता नव्या दमाने पुढील षटक टाकतो.
सध्या तो खूप लहान आहे. अजून त्याने वयाची 19 वर्षेही पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे त्याच्यापुढे खूप मोठी कारकीर्द आहे. त्यामुळे रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांचा वारसा अत्यंत सार्थपणे पुढे घेऊन जाऊ शकेल इतकी गुणवत्ता त्याच्यात निश्चितच आहे हे त्याची प्रत्येक सामन्यातील गोलंदाजी पाहून वाटते. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्याने हातात बॅट धरली होती. मात्र, काही काळानंतर त्याला फलंदाजीबरोबरच डावखुरी फिरकी गोलंदाजी आवडू लागली व त्याने 12, 14 व 16 वर्षांखालील गटात खेळत असताना आपला आदर्श रवींद्र जडेजा असल्याचे व त्याच्यासारखेच भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले होते. त्यावेळी अनेकांनी त्याचे विधान हासण्यावारी नेले होते. मात्र, तो जे बोलला ते त्याने करुन दाखवले.
तो मुळचा मध्य प्रदेशमधील सीधी या जिल्ह्यातील भरतपूर या छोट्या खेड्यातून आलेला आहे. मात्र, त्याची स्वप्ने मोठी आहेत व त्याचा पाठलागही तो प्रमाणीकपणे करत आहे. लहान असताना त्याची प्रकृती फारशी चांगली राहात नसे त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मैदानी खेळ खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यानेही जिद्दीने क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले व आज तो देशभरात नावारुपाला आला आहे.
हरिद्वारला दर्शनासाठी आपल्या आई व वडीलांसह गेलेल्या सौम्यला तो भविष्यात डॉक्टर किंवा इंजिनिअर बनेल असे एका ज्योतिषाने सांगितल्यावर तो चक्क रडू लागला. त्याने आपले क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न सांगितले व त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पूर्ण पाठींबा मिळाला व आज तो भारताच्या युवा संघात दाखल झाला. त्याची कामगिरी अशीच सरस कामगिरी सातत्यपूर्ण राहीली तर येत्या काळात तो भारताच्या प्रमुख संघात दाखल झालेला दिसेल व त्याच्या रुपाने भारतीय संघाला दुसरा रवींद्र जडेजा गवसलेला असेल.