इंग्लंडचा संघ येथे दाखल झाला व त्यांनी पहिल्या कसोटीपूर्वी सरावही सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे मिडिया ट्रायल करण्याची व समोरच्या संघावर दडपण टाकण्याची कृती (गैर म्हटलेले जास्त योग्य ठरेल) त्यांनीही आत्मसात केली आहे बहुतेक. मात्र, त्याला घाबरण्याचे कारणच नाही कारण आजच्या क्रिकेटमध्ये सर्वच फलंदाज टी-२० क्रिकेटच्या लशीकरणावर पोसलेले आहेत.
एकेकाळी कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यांत काही बळी लवकर पडले की अशा एखाद्या खेळाडूला खेळपट्टीवर पाठवले जाते की तो समोरच्या गोलंदाजांवर हल्ला चढवतो व त्यांचा रिदम कसा चुकेल हे पाहतो. हे त्यावेळी ठीक होते.
सध्याच्या टी-२० क्रिकेटच्या युगात द्विशतकी आणि एकदिवसीय सामन्यात त्रिशतकी धावसंख्याही अपूरी वाटते तीथे कसोटीत तंत्रशुद्धता राहील याची अपेक्षा करणेच चुक आहे. भारताच्या वीरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्येही अशाच फलंदाजीचे दर्शन घडवले. म्हणूनच कदाचित भारताला कसोटी सामन्यांच्या इतिहासातील पहिला त्रिशतकवीर फलंदाज गवसला. तंत्रच केवळ श्रेष्ठ असते तर भारताच्या विक्रमादीत्य सुनील गावसकर, राहुल द्रविड व काही प्रमाणात सचिन तेंडुलकर यांच्या नावावर एखादे तरी त्रिशतक दिसले असते.
इंग्लंडने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिके, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गेल्या दोन मोसमांतील कसोटी मालिकांमध्ये या बॅजबॉलचा वापर केला. त्यात त्यांना जवळपास ८० टक्के यशही मिळाले. त्यामुळेच त्यांचे मुख्य प्रशिक्षक जे एकेकाळचे न्यूझीलंडचे आक्रमक फलंदाज होते ते ब्रेंडन मॅक्युलम याच बॅजबॉलमुळे नावाजले गेले. त्यांच्या या कल्पनेला इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने उचलून धरले व कर्णधार बेन स्टोक्स आणि नवोदित हॅरी ब्रुक्स यांनी मैदानावरही त्याला यश मिळवून दिले. झाले या अशाच थोड्या कौतुकात हुरळून जाण्याची इंग्लंडची ही काही पहिलीच वेळ नाही.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेला त्यांचा संघ अनेकदा दिसला आहे. केवळ नशीबाच्या जोरावर व आयसीसीच्या अनाकलनिय नियमाच्या फायद्यामुळेच त्यांना एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेचे २०१९ साली विजेतेपद मिळवता आले अन्यथा या असल्या बॅजबॉल थेरीवर त्यांना जर विजयाची आशा कायम राहिली तर ते त्यांच्याच क्रिकेटला घातक ठरेल.
भारतात भारताला हरवणे कर्म कठीण काम असते कारण येथील खेळपट्टी पहिल्या चेंडूपासूनच फिरकीच्या प्रेमात असते. नव्या चेंडूलाही थोडी मदत मिळते. इंग्लंडच्या संघात जेम्स अंडरसन व भारतीय संघात जसप्रीत बुमराह हे त्यासाठीच आहेत की पहिले काही बळी लवकर मिळाले तर नंतर फलंदाजीला येत असलेल्या फलंदाजंवर फिरकीचे चक्रव्युह रचायचे व त्यातच त्यांच्या डावाला गळती लावायची.
बॅजबॉलमध्ये काय होते की समोरून कीतीही फलंदाज बाद होत राहो एका फलंदाजाने आक्रमकता सोडायची नाही. पण त्याची सध्याच्या काळातील भारतीय फलंदाजीचा फॉर्म पाहता भीती बाळगायचे कारण नाही. एक प्रमुख फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटीत नसला तरीही कर्णधार रोहित शर्मासह अन्य फलंदाज असे आहेत की त्यांना सुर गवसला तर ते बॅजबॉलच्या चिंधड्या उडवायला कमी करणार नाहीत. पहिली कसोटी त्यासाठीच महत्वाची आहे. पाहु या काय होते ते.