मुंबई – देशाच्या आर्थिक राजधानीत वसलेल्या धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मुंबई महापालिकेतर्फे येथील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.
महापालिकेच्या प्रयत्नांमुळेच येथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली नाही. मात्र असं असताना देखील धारावीमध्ये आठवड्याभरात वाढलेले कोरोना रुग्ण प्रशासनासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा ठरले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या सात दिवसांपासून धारावी झोपडपट्टीतील रुग्णांमध्ये दररोज दोन आकडी संख्येने वाढ होत आहे. याबाबत महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने माहिती देताना, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच धारावीतील रुग्ण वाढीचा दर चढा राहिल्याची माहिती दिली.
प्राप्त माहितीनुसार येथे आजपर्यंत कोरोनाचे ३०८७ रुग्ण आढळले असून यातील २६२५ कोरोना रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर सप्टेंबर महिन्याचा सुरुवातीपासून आजअखेर १८२ कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. आज धारावीत २२ कोरोनाग्रस्त वाढलेत.
धारावी झोपडपट्टीमध्ये दाट लोकवस्ती, स्वच्छतेच्या अपुऱ्या सुविधा, सार्वजनिक सौचालयांचा वापर अशा कोरोना फैलावाला पूरक ठरणाऱ्या बाबी असल्याने येथील कोरोना परिस्थितीबाबत जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे.