पुणे – मुंबईत बुधवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी मुंबई परिसरातील रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून, यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामध्ये पुण्यामार्गे धावणाऱ्या गाड्यांचादेखील समावेश आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मुंबई परिसरातील अनेक रेल्वे स्थानके आणि रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. यामुळे अनेक मार्गांवरील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेंतर्गत धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळपत्रकातदेखील बदल केला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथून सुटणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. तर पुण्यामार्गे धावणाऱ्या मुंबई-बेंगळुरू एक्स्प्रेस आणि मुंबई-गडाग विशेष रेल्वे या गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. रेल्वे गाड्यांच्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे दोनपेक्षा अधिक तासांच्या अंतराने या गाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे.
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे दरवर्षी पावसाचा फटका मुंबईची “लाईफलाईन’ असणाऱ्या उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांना देखील बसतो. पावसाळ्यात अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकदेखील कोलमडते. परंतु, यंदा तुलनेने कमी रेल्वे गाड्यांचे संचलन असल्याने प्रशासनालादेखील काहीसा दिलासा मिळाला आहे.