दुग्धजन्य पदार्थांची मागणी 30% घटली
पुणे – करोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा मोठा फटका देशातील दुग्ध व्यवसायाला बसला आहे. गेल्या दीडदोन महिन्याच्या कालावधीत देशभरात दुग्धजन्य पदार्थांची मागणी सुमारे तीस टक्क्यांनी घटली आहे. यामुळे दुग्धव्यावसायाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन कालावधीत लग्नासह अन्य सर्व सार्वजनिक कार्यक्रम स्थगित झाल्याने दुग्धजन्य पदार्थांचा वापर पूर्णपणे थांबला. परिणामी दुग्ध प्रक्रिया उद्योगाचे अर्थकारणच कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे.
आइस्क्रीम, मिल्कशेक्स आणि लस्सी या उत्पादनांची मागणीही थंडावली आहे. वर्षाच्या एकूण मागणीचा विचार केल्यास मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यातच तब्बल साठ टक्के मागणी होते. आइस्क्रीम खाऊन आजारी पडू या भीतीने नागरिकांनी शीतपेयांसहित आइस्क्रीम, लस्सी आदी पदार्थांकडेही पाठ फिरविली.
लॉकडाऊन जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून दूध वगळता इतर सर्व पदार्थांची मागणी 35 टक्क्यांनी घटली होती. अनेक ठिकाणी लॉकडाऊनमधून सूट दिली असल्याने मागणीतील घट मार्चच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोठी दुकाने, रिटेल शॉप बंद झाले असले तरी दूध मिळणाऱ्या ठिकाणी पनीर, तूप उपलब्ध करण्याचे प्रयत्न अनेक दुग्ध संघांनी केली. पनीर, तुपाला इतर पदार्थांच्या तुलनेत मागणी काहीशी समाधानकारक राहिल्याचे दूध संघ व उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. अनेकांना आता विक्री पुन्हा सुरू करण्याचे आव्हान आहे.
पूर्वेकडील राज्यांना जास्त फटका
महाराष्ट्रात सरकारने दूध खरेदी सुरू करून त्यापासून पावडर बनविण्याची जबाबदारी मोठ्या दुग्ध संघांना दिली आहे. कर्नाटकात कर्नाटक दूध महासंघ, गुजरातमध्ये अमूल सारख्या दुग्ध संस्था शेतकऱ्यांशी बांधीलकी म्हणून दूध खरेदी करत आहेत. या उलट ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांत मातब्बर दूध संस्था नसल्याने व विक्री व्यवस्थेवर परिणाम झाल्याने त्या दूध खरेदी करू शकत नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.