काऱ्हाटी, (वार्ताहर) – बारामती तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अगदीच कमी पाऊस झाल्याने सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न तर मोठा गंभीर बनला आहे.
चाराच उपलब्ध नसल्याने व मिळणारा चारा जादा भावाने विकत घेण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्ग चांगलाच धास्तावला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपली जनावरे पडेल त्या भावाने विकण्याच्या मनःस्थितीत आहेत.
तालुक्यातील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करत असतात. परंतु, सध्या दुधाला कवडीमोल भाव आहे. तर चाराच मिळेना अशा दोन्ही बाजूंनी शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळी स्थिती असल्यामुळे अनेक पशुपालक जादा दराने चारा खरेदी करीत आहेत. अनेक शेतकरी पाण्याची परिस्थिती पाहूनच जनावरांना चाऱ्याअभावी विकत आहे. मकाचा चारा तीन चार हजार रुपये गुंठा भाव मिळत आहे.
सध्या उन्हाचा कडाका वाढला असून जनावरांच्या दूध उत्पादनावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे महागाईचे खाद्य घालून कवडीमोल दराने दूध विक्री शेतकऱ्यांना नाईलाजाने करावी लागत आहे. अशा परिस्थितीमुळेच अनेक शेतकरी अडचणीत आला आहे.
पशुखाद्याचे दर
* सरकी पेंड १३०० रुपये ते १४०० (प्रति ४० किलो)
*गोळी पेंड: १६५० ते १७०० रुपये (प्रति ५० किलो)
* मका भुस्सा: ११०० ते १२०० रुपये (प्रति ५० किलो)
* शेंग पेड : २५०० ते २८०० रुपये (प्रति ४५ किलो)
*गहू आट्टा: १३५० ते १४०० रुपये (प्रति ४५ किलो)
* ओला ऊस: ४५०० रुपये टन ओला मकाः २००० रुपये (प्रतिगुठा)
* ओलीकडयळ : १७०० ते २००० रुपये (प्रतिगुठा)
* वाळका कडबा : २००० ते २८०० रुपये (शेकडा).