मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने होळीच्या अगोदरच मोठा दिलासा दिला आहे. राणे पिता-पुत्रांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. नारायण राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिंडोशीतील सत्र न्यायालयाने आज निर्णय दिला. न्यायालयाने या प्रकरणी राणे पिता-पुत्रांना दिलासा दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वकील सतिश मानेशिंदे यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी,”केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पंधरा हजार रुपयांच्या हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारच्या शुल्लक केसेसकडे लक्ष न देता, ज्या क्रिमिनल केसेस आहेत, त्याकडे जास्त लक्ष द्यावं, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.”असे त्यांनी म्हटले.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिंडोशी न्यायालयाने आज निर्णय दिला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गुन्हा राणे पिता-पुत्रांविरोधात मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. दिशा सालियनच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी राणे पितापुत्रांची चौकशीही केली होती. राजकीय दबावामुळे आपल्याला गोवल्याचा आरोप राणेंनी केला होता. आज दिंडोशीतील सत्र न्यायाधीश एस. यू. बघेल राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय दिला.
दरम्यान, दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केले होते. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर राणे पिता-पुत्रांची चौकशीही करण्यात आली होती.