हमीरपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातील जनतेच्या हुशारीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे उत्तरप्रदेशात कॉंग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत खातेही उघडू शकणार नाही, असा दावा भाजपकडून शनिवारी करण्यात आला.
उत्तरप्रदेशचे भविष्य मला दारूच्या नशेत रस्त्यात लोळून नाचताना दिसत आहे, असे वक्तव्य नुकतेच राहुल यांनी काही तरूणांचा संदर्भ देऊन केले. त्यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
उत्तरप्रदेशच्या जनतेने नेहरू-गांधी परिवाराच्या चार पिढ्यांना निवडून लोकसभेवर पाठवले. तसे असूनही राहुल यांनी त्या जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले, असे ते म्हणाले. मागील काही वर्षांपासून कॉंग्रेसची उत्तरप्रदेशात सातत्याने राजकीय पीछेहाट सुरू आहे.
तो पक्ष मागील लोकसभा निवडणुकीत त्या राज्यात अवघी १ जागा जिंकू शकला होता. स्वत: राहुल यांनाही उत्तरप्रदेशातील अमेठी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. त्याचा आधार घेऊन ठाकूर यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले.