Nana Patole On Modi Government – भाजपचा देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचा नारा म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सर्व नेते भाजपसोबत असा आहे. सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. तसेच पंतप्रधान मोदींनी अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला आणि (त्यानंतर) त्यांना भाजपचे राज्यसभा सदस्य केले. ज्या नेत्यांवर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यांच्यासाठी भाजप ही ढाल बनली आहे, असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन, दादर येथे पार पडली. या बैठकीला केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष मधूसुदन मिस्त्री, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, शेतकरीविरोधी, तरुणांचा अपेक्षाभंग करणारे, महागाई, बेरोजगारी नियंत्रित करु न शकलेल्या मोदी सरकारविरोधात जनतेत प्रचंड चीड आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. महाविकास आघाडी मजबूत असून केंद्रातील भाजपच्या सरकारच्या पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचणार आहे. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी अनुकूल असून, परिवर्तनाचे वारे वाहत आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची तयारी झाली असून, मित्रपक्षांबरोबरचे जागा वाटप, संघटनेची तयारी, प्रचारातील मुद्दे यांवर राज्य निवड मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपा, वंचित बहुजन आघाडीसह एकत्रितपणे निवडणुक लढवण्याची तयारी असून मविआ लोकसभेच्या 42 जागांवर विजय संपादन करेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.