राजगुरूनगरात कॉंग्रेस निर्धार मेळाव्यात जिल्हा अध्यक्ष जगताप यांची माहिती
राजगुरूनगर – खेड-आळंदी मतदारसंघ कॉंग्रेसला सोडा ही कार्यकर्त्यांची मागणी रास्त असून शेवटच्या घटकेपर्यंत कॉंग्रेला खेडचे जागा मिळावी यासाठी नेत्यांकडे माझी भूमिका आग्राही असेल, आघाडीचा जो उमेदवार असेल तो निवडून आणावा, असे आवाहन जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी केले.
खेड तालुका कॉंग्रेस आयोजित निर्धार मेळाव्याचे राजगुरूनगर येथे रविवारी (दि.22) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जगताप बोलत होते. त्याप्रसंगी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रिया पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ शैलेश मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे, कॉंग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ दौंडकर, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष किरण आहेर, संग्राम मोहोळ, पृथ्वीराज पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा अर्चना शहा, तालुका महिला अध्यक्षा जया मोरे, संदीप भोसले, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्याध्यक्ष विशाल तुळवे, जमीर काझी, यांच्यासह कॉंग्रेसचे जिल्ह्यातील, तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
शैलेश मोहिते म्हणाले, या सरकाराला गड, किल्ले बांधता आले नाहीत, मात्र गड किल्ल्यांबाबत फालतू निर्णय घेऊन सर्वसामान्यांनाही फसवणूक करीत आहेत. देशातील सर्वसामान्य नागरिकांचे देणेघेणे नाही. शिवसेना नेते लाचार झाले आहेत. या निवडणुकीत सत्तेची मस्ती जिरवायचे काम जनतेने करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बाबा राक्षे म्हणाले की, आजी-माजी आमदरांभोवती राजकारण फिरत आहे का? असा सवाल विचारात तालुक्यात अनेक दिग्गज आहेत त्यांचा पक्षाने विचार करावा. तालुक्याच्या दृष्टीने चांगला उमेदवार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रिया पवार, तालुका अध्यक्षा जया मोरे आदी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
“त्यांची’ उपस्थिती लक्षणीय
राजगुरूनगर येथील कॉंग्रेसच्या निर्धार मेळाव्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. शैलेश मोहिते पाटील, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल राक्षे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तालुक्यातील एकीमुळे शिवसेनेच्या खासदारांना घरी बसवले आता आमदारांना घरी पाठविणार. येथील हुतात्मा राजगुरु स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक गेली अनेक वर्षे वंचित ठेवले. निवडणुकीत परिवर्तन करण्याची ताकद फक्त कॉंग्रेसमध्ये आहे. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभेची जागा कॉंग्रेसला सोडावी.
– विजय डोळस, तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस
स्व. नारायण पवार आणि दिलीप मोहिते, सुरेश गोरे यांच्या कामाचे जनता मूल्यमापन करीत आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे आमदार असल्यासारखे वाटतच नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. शिवसेनेची ताकद आता तालुक्यात उरली नाही. तालुक्यात कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. आजी-माजी सोडून नव्या चेहऱ्याला जनता संधी देईल. म्हणून कॉंग्रेसला ही जागा सोडावी.
– अमोल पवार, माजी उपसभापती, खेड पंचायत समिती