नाशिक – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची झालेली भेट, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा यामुळे राज्यातील राजकारणातील संभ्रम वाढला असून राष्ट्रवादीबाबतचा संभ्रम लवकरच दुर होईल, असे सुचक विधान करत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गुढ अधिकच वाढवले आहे.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलतांना महाजन म्हणाले, राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. अजित पवार, छगन भुजबळ तसेच दिलीप वळसे पाटील हे भाजपबरोबर येतील असे वाटले होते का, असा प्रश्न जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबात बोलताना त्यांनी केला.
सध्या सत्तारूढ पक्षांमध्ये खातेवाटपावरून रस्सीखेच सुरू असली तरी कोणाला कोणते खाते द्यायचे हे नेते ठरवतील आणि सर्वसंमतीने यावर निर्णय होईल. यावरून सध्या सरकारमध्ये कोणतेही ताणतणाव नसल्याचे महाजन म्हणाले.
ध्वजारोहणासाठी मंत्र्यांना वेगवेगळे जिल्हे देण्यात आले त्यामुळे पालकमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहे याबाबत विचारले असता पालकमंत्री पदाबाबत काहीच वाद नाही. छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री व्हावे असे त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत असेल तर गैर नाही, असे ते म्हणाले.