मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाने शिवसेना पक्षावरील आपला दावा सादर करत थेट निवडणूक आयोगाकडे मागणी केली. यानंतर निवडणूक आयोगानेही कार्यवाही सुरू करत दोन्ही गटांना शिवसेनेवरील दाव्याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटाच्या याच मागणी विरोधात मोठी कारवाई करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. ठाकरे गटाने शिंदे गटाच्या या मागणविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका सादर केली आहे. या याचिकेत ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत केली आहे. या प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग यावर कार्यवाही करू शकत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या याचिकेत करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला बहुमताचा कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा निर्देश दिला आहे. यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाणही कोणाकडे राहणार याबाबतही ८ ऑगस्टला फैसला होणार आहे.