नवी दिल्ली – दक्षिण अशिया प्रदेशात चीन आपला प्रभाव वाढवत असून या बाबत भारताने सावध राहण्याची गरज आहे असे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मालदीव आता चीनच्या प्रभावक्षेत्रात गेला आहे आणि श्रीलंकाही चीनच्याच कच्छपी लागला आहे.
मनिष तिवारी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, भूतानमधील प्रादेशिक चिंता, नेपाळमधील वाढलेला चीनचा प्रभाव आणि म्यानमारमधील लष्करा सोबतचे चीनचे दीर्घकाळचे संबंध, जे दक्षिण आशियातील चीनच्या धोरणात्मक विस्ताराला अधोरेखित करतात असे म्हटले आहे. चीन भूतानमधील भूभाग बळकावत आहे याकडेही तिवारी यांनी लक्ष वेधले.
चीनने भूतानसोबतच्या सीमा विवादांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देऊनही, विवादित प्रदेशातील गावांमधील वस्त्यांमध्ये घुसखोरी केली आहे त्याचीही भारताने दखल घेण्याची गरज आहे. चीनने नेपाळमधील राजकारणावर आपला प्रभाव वाढवला आहे. काँग्रेस नेते तिवारी यांनी एक्सवरील त्याच पोस्टमध्ये म्हटले आहे की,
म्यानमारमधील लष्करी जंता अनेक दशकांपासून कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या नजरेत आहे. याचबरोबर पाकिस्तान तर चीनचेच गिऱ्हाईक आहे. बांगलादेशातील आर्थिक प्रभावही चीनने वाढवला आहे. या साऱ्या बाबी भारतासाठी चिंता कराव्यात अशा आहेत. त्यामुळे भारताने त्याची दखल घेऊन वेळीच सावध राहिले पाहिजे असेही त्यांनी सुचवले आहे.