नवी दिल्ली -महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच्या घटनांबाबत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, त्या घटनांमागील कारणांचा शोध घेण्याचेही सूतोवाच केले आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोने एक अहवाल जारी केला. त्यानुसार, 2018 मध्ये देशभरात 5 हजार 763 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर्षी महाराष्ट्रातील सर्वांधिक 2 हजार 239 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. तो विषय शुक्रवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित झाला. त्यावेळी केंद्रीय कृषि राज्यमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडली.
केंद्र आणि महाराष्ट्र सरकारांनी अनेक पाऊले उचलूनही शेतकरी आत्महत्येचे सर्वांधिक प्रमाण चिंताजनक आहे. ती बाब वेदनादायी आहे. महाराष्ट्रात तशी स्थिती का आहे हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही शेतकरी, त्यांचे प्रतिनिधी आणि कृषि क्षेत्राशी संबंधितांशी चर्चा करू, असे त्यांनी म्हटले. देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कृषि विभागाकडे प्रथमच 8 कोटी शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले.