- निमंत्रण पत्रिकेवरून पालकमंत्री गायब
- प्रशासनाच भाजपासोबत राजकारण करतेय – महापौर माई ढोरे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभार कोणत्या-ना कोणत्या कारणावरून नेहमीच वादग्रस्त ठरत असतानाच आता राजशिष्टाचार मोडल्याच्या कारणावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. गेली तीन वर्षे भाजपाचे पालकमंत्री असताना त्यांना पत्रिकेवर स्थान देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी महापालिकेच्या पत्रिकेवर अजित पवारांना स्थान न दिल्यामुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या भूमिकेनंतर महापौर माई ढोरे यांनी मात्र सत्ताधाऱ्यांचा यामध्ये दोष नसून प्रशासनच आमच्याशी राजकारण करत असून पालकमंत्र्यांना डावलण्याची चूक प्रशासनाची असल्याचे म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. निविदा, ठेकेदारांची रिंग, भ्रष्टाचार, वाढीव बिले, सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत कलह, महापालिकेची नविन प्रशासकीय इमारत, यांत्रिकीकरणाद्वारे साफसफाई, उद्यान यासह अनेक विषयांवरून सत्ताधारी अडचणीत आले आहेत. विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला घेरलेले असतानाच आता राजशिष्टाचाराचा विषय आज चर्चेला आला आहे. राज्यात यापूर्वी भाजपाची सत्ता असताना सुरुवातील पालकमंत्री गिरीश बापट आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा प्रत्येक पत्रिकेमध्ये राजशिष्टाचार म्हणून आवर्जून उल्लेख केला जात होता. मात्र राज्यातील भाजपाची सत्ता जावून महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बनले.
पवार पालकमंत्री बनल्यानंतर मात्र राजशिष्टाचार डावलण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यात झालेल्या पलिकेच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या पत्रिकेवर अजित पवार यांचा उल्लेख न केल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने व विद्यमान विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे. विरोधकांना डावलण्याचा आणि राजशिष्टाचार मोडण्याचा प्रकार खेदजनक असल्याचे नमूद करत काटे व साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. आमची पालिकेत सत्ता असताना व राज्यात भाजपाची सत्ता असताना राजशिष्टाचार पाळण्यात राष्ट्रवादीने कधीही कसूर केला नसून भाजपाला मात्र हा मोठेपणा दाखविता आला नसल्याचेही या निवेदनात काटे आणि साने यांनी म्हटले आहे.
प्रशासनाचे राजकारण – महापौर
राजशिष्टाचार हा पाळणे गरजेचे असून यापुढे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे नाव आम्ही पत्रिकेत घेणार आहोत. यापूर्वीही आमचा विरोध नव्हता मात्र प्रशासन आमच्याशी राजकारण करत असल्याचा आरोप महापौर माई ढोरे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर महापौरांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्र्यांचे नाव पत्रिकेत घेण्यास आमचा कोणाचाही विरोध नसल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.