नायडू यांची कृती ठरली दुर्मिळ
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राज्यसभेत केलेल्या भाषणातील एक शब्द सभागृहाच्या कार्यवाहीतून वगळण्यात आला. राज्यसभेचे अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू यांची ती कृती दुर्मिळ मानली जात आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर झालेल्या चर्चेला मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीपुस्तकाचे (एनपीआर) जोरदार समर्थन केले. केंद्रात सत्तेवर असताना कॉंग्रेसने 2010 मध्ये एनपीआर आणण्यासाठी पाऊले उचलली. आता तो पक्ष घूमजाव का करत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्या वक्तव्याशी निगडीत एक शब्द नायडू यांनी कामकाजातून वगळला.
मोदी यांच्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचे भाषण झाले. आझाद यांचा एक शब्दही नायडू यांनी वगळला. नायडू राज्यसभेतील कामकामाचा आढावा घेऊन नियमितपणे अयोग्य वाटणारा शब्द कामकाजातून वगळतात. मात्र, मोदी यांचा शब्द कार्यवाहीतून हटवण्यात आल्याची बाब विरळा मानली जात आहे.