महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी 15 दिवस म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. हा संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एक सूचक विधान केले. आगामी कालावधीमध्ये राज्यातील जनतेने जर योग्य खबरदारी घेतली तर या संकटावर संपूर्णपणे मात करण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यापूर्वी एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले होते की, संकट जरी गंभीर असले तरी राज्य सरकार खंबीर आहे.
गेल्या महिनाभराच्या कालावधीमध्ये सरकारचा खंबीरपणा निश्चितच दिसला आहे. आता नव्याने संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेवर खबरदारी घेण्याची जबाबदारी टाकली आहे आणि ही जबाबदारी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची काळजी राज्यातील जनतेला घ्यावीच लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा तीन आठवड्यांसाठी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली तेव्हा पहिल्या काही दिवसांमध्ये लोक या विषयाबाबत गंभीर नव्हते. रस्ते, भाजीपाला मार्केट, मंडई येथील गर्दी कमी होत नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून आज देशातील करोनाग्रस्तांचा आकडा 8 हजारांवर जाऊन पोहोचला आहे आणि महाराष्ट्राचा विचार करता हा आकडा 2 हजारांपर्यंत आला आहे.
सरकारचे सर्व प्रतिनिधी, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी सतत सांगत असतानाही अनेक लोकांना लॉकडाऊनचा अर्थ कळत नव्हता आणि बिनधास्तपणे रस्त्यावर फिरणे चालू होते. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे आणि परिणामी लॉकडाऊनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवावी लागली आहे. साहजिकच आता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे लोकांनी आपली जबाबदारी ओळखण्याची हीच वेळ आहे. कारण लोकांनी योग्य खबरदारी घेतली तर सरकारला आपली जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडणे शक्य होणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये वाढीव लॉकडाऊन पिरियडची नवीन नियमावली जाहीर होईल. मिळालेल्या माहितीप्रमाणे राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या प्रत्येक झोनसाठी नियम वेगळे असू शकतात.
ग्रीन झोनमध्ये एकही करोनाग्रस्त नसणार आहे आणि ऑरेंज झोनमधील परिस्थितीही एवढी गंभीर असणार नाही. 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत; पण रेड झोनमधील जिल्हे अत्यंत गंभीर स्थितीत असतील हे नक्की. रेड आणि ऑरेंज झोनमधील रुग्णांवर लक्ष देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करायची असेल तर नागरिकांनी सहकार्य करण्याशिवाय पर्याय नाही. नागरिकांना जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा आणि जीवनावश्यक वस्तू यांचा घरपोच पुरवठा करण्याची खात्री सरकारी प्रतिनिधीने दिली असूनही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत, हीच गंभीर बाब आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सुदैवाने अद्याप करोना विषाणूचा गुणाकार सुरू झालेला नाही. सध्या बेरीज पद्धतीनेच देशातील रुग्णांची संख्या वाढत आहे; पण जोपर्यंत रुग्णांची वजाबाकी होण्यास प्रारंभ होत नाही तोपर्यंत या रोगावर मात केली किंवा नियंत्रण मिळवले, असे म्हणता येत नाही आणि करोनाचा गुणाकार होऊ नये, असे वाटत असेल तर नागरिकांनी अत्युच्च पातळीची खबरदारी घेतल्याशिवाय कोणताही पर्याय समोर नाही. लाखो आरोग्य कर्मचारी आणि हजारो पोलीस कर्मचारी गेले महिनाभर अहोरात्र झटत आहेत. अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांनी फक्त घरी बसून प्रशासनाला आणि सरकारला सहकार्य करणे एवढेच अपेक्षित आहे.
लॉकडाउनचा पिरीयड 30 एप्रिलपर्यंत वाढल्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील एप्रिल हा महिना संपूर्णपणे अनुत्पादक ठरणार आहे. त्याला कोणताही इलाज नसला तरी ही आर्थिक परिस्थिती अधिक खराब होण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी आगामी कालावधीत प्रशासनाला सहकार्य करायला हवे. जगाच्या पाठीवरील इतर देशांमधील लॉकडाउनचा इतिहास बघता हा कालावधी तीन महिन्यापर्यंत वाढू शकतो. लॉकडाउनच्या निर्णयामुळे करोनाचा प्रसार होण्यास नियंत्रण बसते हे ही सिद्ध झाले आहे, हे माहीत असूनही लोकांनी जर सहकार्य केले नाही तर शेवटी त्यांनाच त्याचा त्रास होणार आहे. किरकोळ कारणासाठी किंवा विनाकारण बाहेर पडण्यात काही लोकांना काय आनंद मिळतो हे कळत नाही. सकाळी किंवा संध्याकाळी आरोग्यासाठी फिरायला बाहेर पडणे चांगले असले तरी सध्या त्यासाठी दिवस चांगले नाहीत हे माहीत असूनही असे लोक बाहेर पडत आहेत; पण आता अशा लोकांना कायद्याचा बडगा दिसू लागला असल्याने इतरांनीही शहाणे होण्याची गरज आहे.
खबरदारी घेणे हाच जर या रोगाला प्रतिबंध करण्याचा महत्त्वाचा मार्ग असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी घेण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. नागरिकांनी अत्यंत गांभीर्याने सहकार्य केले तरच राज्यातील किंवा केंद्रातील सरकार सर्व जबाबदारी घेण्यास तयार होईल. त्यामुळे लॉकडाऊनच्या वाढीव 15 दिवसांच्या कालावधीमध्ये देशातील कोट्यवधी लोकांकडून आदर्श वर्तणुकीचा धडा घालून दिला जाईल, अशी आशा करायला हवी. अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांची गंभीर परिस्थिती समोरच असल्याने भारतातील नागरिकांनी कोणताही धोका पत्करण्याची ही वेळ नाही.
अमेरिकेत लॉकडाऊन जाहीर करण्यास वेळ लागला आणि जाहीर केल्यावरही लोकांनी ते गांभीर्याने घेतले नाही आणि परिणामी अमेरिकेतील बळींचा आकडा 21 हजारांवर गेला. या सर्व देशांची तुलना करता भारतातील स्थिती चांगली असली तरी ही परिस्थिती कधी गंभीर होईल याचा नेम नाही. ज्या देशांनी लॉकडाऊनच्या कालावधीत गांभीर्याने नियमांचे पालन केले त्या देशात करोनावर नियंत्रण बसले आहे हे उदाहरण समोर असल्याने भारताने या विषाणूच्या प्रसाराच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करू नये असे वाटत असेल तर आगामी कालावधी अत्यंत खबरदारी घेण्याचा आहे.