वाढत्या उष्म्याने नागरिक त्रस्त; लॉकडाऊनमुळे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक दुकानांना फटका
संतोष पवार
सातारा – करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल बंद करण्यात आली. सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ज्या नागरिकांच्या पंखा, कुलर, एसी अशा साधनांमध्ये बिघाड झाला आहे, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इलक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक दुकाने बंद असल्याने नवीनही घेता येईना आणि जुनाही दुरुस्त करता येईना, अशी अवस्था नागरिकांची झाली आहे.
करोनामुळे लॉकडाऊन जाहीर आहे. सरकारने हा निर्णय जनतेच्या हितासाठीच घेतला आहे. या निर्णयानुसार अत्यावश्यक सेवा वगळता कोणासह घराबाहेर पडता येणार नाही. वैद्यकीय सेवा, किराणा व्यवसाय, भाजीपाला, फळे, दुध अशा जीवनावश्यक वस्तूच नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उष्म्यापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक प्रयत्न करत असले तरी नागरिकांना लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात फ्रीज, फॅन, कुलर, एसी खरेदी करत असतात. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यास नवीन घेणे अथवा परिस्थिती हलाखीची असल्यास आहे त्याच वस्तू दुरुस्त करुन वापरल्या जातात. सद्यस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स, इलक्ट्रिक वस्तूंच्या दुरुस्तीची दुकानेही बंद आहेत. या दुहेरी संकटाचा फटका मोठ्या प्रमाणात नागरिकांना बसत आहे.
एप्रिल महिना अर्धा संपत आला आणि उन्हाळ्याच्या झळा नागरिकांना जाणवू लागल्या. अशा परिस्थितीत घरातील टीव्ही, एसी, कुलर, फॅन बिघडला तर करायचे काय अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. समाजाच्या आरोग्यासाठी लॉकडाऊन गरजेचे आहे. मात्र, आगामी काळात टप्प्याटप्प्याने सूट मिळाल्यास नागरिकांना सुविधा मिळणे सुलभ होणार आहे.
व्यावसायिकांना जाणवतेय आर्थिक चणचण
करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने सर्वच क्षेत्रात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. व्यवसाय बंदचा फटका असून अनेकांचे आर्थिक नियोजनच कोलमडले आहे. यातून इलक्ट्रिक वस्तू दुरुस्ती करणारे व्यवसायिकही सुटले नाहीत. महिनाभर व्यवसाय बंद राहिल्याने आता करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत इलक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांना उत्पन्नाचे चांगला स्त्रोत असतो. या उत्पन्नातून पावसाळ्यातील तीन- चार महिने त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र, महिनाभर व्यवसाय बंद राहिल्याने या व्यवसायिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.